रेल्वेतून प्रवास करणाऱ्या महिलांना अनेकदा लैंगिक अत्याचारांना सामोरे जावे लागते, याकडे ‘बायलांचो एकवोट’ संघटनेच्या अध्यक्ष आवदा व्हिएगस यांनी रेल्वे मंत्रालयाचे लक्ष वेधले आहे. गोव्यात बस प्रवास करणाऱ्या महिलांना कित्येकवेळा विनयभंगाच्या प्रकाराला सामोरे जावे लागते.
अशा घटना रोखण्यासाठी राज्य सरकारने आवश्यक ते खबरदारीचे उपाय योजावेत, असेही त्यांनी म्हटले आहे.
रेल्वे प्रवासादरम्यान महिलांना पुरेशी सुरक्षा आणि अत्याचाराची त्वरित तक्रार नोंद करण्यासाठी सुविधा पुरवावी. तसेच प्रत्येक रेल्वेमध्ये पोलिस पथकाची नियुक्ती करावी, अशी मागणी व्हिएगस यांनी केली आहे.
रेल्वे मंत्रालय तसेच अन्य संबंधितांना लिहिलेल्या पत्रात व्हिएगस यांनी म्हटले की, अलीकडच्या काळात महिलांची सुरक्षितता हा चिंतेचा विषय बनला आहे.
‘व्हीसी’द्वारे साक्ष नोंदवा!
व्हिएगस म्हणाल्या की, आपल्याकडे अशा कित्येक तक्रारी आल्या आहेत, जेथे पीडित महिलेला तक्रार नोंदविण्यातही बराच त्रास सहन करावा लागतो. कित्येकवेळा धावत्या रेल्वेत अत्याचार होतात आणि दुसऱ्या जंक्शनकडे पोहोचेपर्यंत त्यांना तक्रार करण्याची कुठलीही सोय नसते.
जंक्शनवरील पोलिस स्थानकात तक्रार देण्यासाठी त्यांना तासन्तास खोळंबून राहावे लागते. त्यामुळे रेल्वेतच पोलिस नेमल्यास त्यांची तक्रार त्वरित नाेंदवून घेतली जाऊ शकते. पीडितांना साक्ष देण्यासाठी प्रत्यक्ष बाेलावण्याऐवजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ती नोंदवावी, अशी मागणी त्यांनी केली.
अलीकडच्या काळात ट्रेनमध्ये अल्पवयीन मुलांवरील लैंगिक अत्याचाराची पाच प्रकरणे घडली आहेत. बालशोषण रोखण्यासाठी आम्ही संबंधित यंत्रणेला आवाहन केले आहे.
महिला आणि बाल प्रवाशांची सुरक्षा, विशेषत: रात्रीच्या प्रवासावेळी अधिक सुरक्षा पुरविण्यासाठी रेल्वेत सुरक्षा दल तैनात करण्याची मागणी आम्ही केली आहे, असेही आवदा व्हिएगस यांनी सांगितले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.