पणजी: मान्सूनपूर्व काळात सुरुवातीला रखडलेल्या पावसाने गेल्या तीन दिवसांपासून राज्यभर हजेरी लावली. त्यामुळे सरासरीच्या तुलनेत यंदा तो ४० टक्के जास्त पडला आहे. १ मार्च ते २४ मे या मान्सूनपूर्व कालावधीत राज्यात सरासरी २४.६ मिमी इतक्या पावसाची नोंद होते. परंतु, यंदा मात्र या काळात ३४.६ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
मान्सूनपूर्व पावसाने सलग दोन दिवस राजधानी पणजीसह राज्यातील विविध भागात जोरदार हजेरी लावली. त्यामुळे खांडेपारमध्ये एका शाळेची संरक्षक भिंत कोसळली. हणजूणमध्ये वीजखांब रस्त्यावर कोसळून वाहतुकीस अडथळे निर्माण झाले. तर काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले. यंदा आतापर्यंत केपे येथे सर्वाधिक मान्सूनपूर्व पावसाची नोंद झाली आहे.
मान्सूनच्या पावसाचे राज्यात आगमन होण्याआधी दरवर्षी मार्चनंतर मान्सूनपूर्व पावसास सुरुवात होते. परंतु, यंदा काहीच भागांमध्ये मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे राज्यात सरासरीच्या तुलनेत ४३ टक्के तूट होती. पण, वातावरणातील बदलांमुळे गेल्या तीन-चार दिवसांमध्ये राज्यभर मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली.
त्यामुळे १ मार्च ते २४ मे या कालावधीत मान्सूनपूर्व पाऊस ४० टक्क्यांनी वाढल्याचे राज्य हवामान खात्याने स्पष्ट केले आहे. दरम्यान, पुढील दोन दिवसांत मान्सून केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज केंद्रीय हवामान विभागाने वर्तवला आहे. तसे झाल्यास जूनच्या पहिल्या आठवड्यातच तो गोव्यात दाखल दाखल होण्याचा अंदाजही हवामान खात्याने वर्तवला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.