पणजी: पर्वरीतील श्रीनिवास नायक यांच्यावरील गोळीबार प्रकरणाचा तपास निर्णायक टप्प्यावर पोहोचला असून, गुन्हे शाखेने हल्ल्यात प्रत्यक्ष सहभागी असलेल्या दोन्ही मुख्य शूटरसह सहा आरोपींना अटक केली आहे. मंगळवारी चेन्नईतून दुसरा शूटर अर्पुथराज ऊर्फ ‘अन्ना’ (वय ४९) आणि त्याचा साथीदार पवन सौर (वय १९) यांना जेरबंद करण्यात आले. त्यामुळे या हल्ल्यामागील सूत्रधार आणि नेमका उद्देश उघड होण्याची शक्यता बळावली आहे.
२८ ऑगस्ट रोजी रात्री पर्वरीतील हॉटेल निओ मॅजेस्टिकबाहेर कॅसिनो व्यावसायिक श्रीनिवास नायक आपल्या वाहनाकडे जात असताना दोन हल्लेखोरांनी त्यांच्यावर तीन ते चार गोळ्या झाडल्या होत्या. नायक या हल्ल्यातून बचावले. त्यांच्या अंगरक्षकाने प्रत्युत्तरादाखल गोळीबार केल्यानंतर हल्लेखोर महामार्गाच्या दिशेने पसार झाले. या घटनेनंतर पर्वरी पोलिस ठाण्यात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्हे शाखेच्या पथकाने तामिळनाडूतील चेन्नई येथील लाईट हाऊस पोलिस ठाण्याच्या हद्दीत सापळा रचून अर्पुथराज ऊर्फ ‘अन्ना’ पुलराज नाडर (४९) आणि त्याचा साथीदार पवन सौर (१९) यांना अटक केली. अर्पुथराज हा या प्रकरणातील दुसरा मुख्य शूटर असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. पवनचा या कटात थेट सहभाग असल्याचे तपासात समोर आल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.
अर्पुथराज हा मूळचा तिरुनेलवेली, तामिळनाडू येथील असून सध्या मुंबईत राहत होता. पवन सौर हा मूळचा मध्य प्रदेशातील असून तोही मुंबईत वास्तव्यास होता. तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी काझू शेख, इस्रार अली आणि सूरज आचार्य यांना मुंबई व उत्तर प्रदेशातून अटक केली होती. त्यानंतर गुन्हे शाखा आणि उत्तर प्रदेश एसटीएफच्या संयुक्त कारवाईत मुख्य शूटर बाबू अली याला भारत-नेपाळ सीमेवरून ताब्यात घेण्यात आले.
दोन्ही मुख्य शूटर पोलिसांच्या ताब्यात आल्याने गोळीबाराच्या कटाची साखळी उलगडण्याच्या दृष्टीने तपासाला महत्त्वाचे वळण मिळाले आहे. मात्र, श्रीनिवास नायक यांना लक्ष्य करण्यामागील मुख्य सूत्रधार कोण आणि हल्ल्याचा नेमका उद्देश काय, याचा तपास अद्याप सुरू आहे. गुन्हे शाखेचे अधीक्षक राहुल गुप्ता यांच्या माहितीनुसार, या प्रकरणामागील सूत्रधार आणि हल्ल्याचा उद्देश शोधण्यासाठी अटक केलेल्या आरोपींची कसून चौकशी करण्यात येत आहे.
प्राथमिक तपासानुसार, २०१४ मध्ये तळोजा मध्यवर्ती कारागृहात भावाला भेटण्यासाठी गेलेल्या बाबू ऊर्फ इसार अली याची ‘अन्ना’ नावाच्या कैद्याशी ओळख झाली होती. २०२४ मध्ये सुटका झाल्यानंतर अन्नाने गोव्यात व्यवसाय सुरू केला आणि जानेवारी २०२६ मध्ये बाबूला गोव्यात बोलावले. एका मोठ्या व्यक्तीला लक्ष्य करण्यासाठी अन्नाने तीन पिस्तुलांची व्यवस्था करून बाबूला ५ लाख रुपयांची सुपारी दिल्याचा दावा तपासातून समोर आला आहे. पैशांच्या मोबदल्यासाठी बाबू आणि अन्ना यांनी श्रीनिवास नायक यांच्यावर गोळीबार केल्याचा पोलिसांचा प्राथमिक संशय आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.