फोंडा: फोंडा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या या मतदारसंघातील राजकीय वातावरणाला धुमारे फुटत चालले असून ‘शह-काटशह’चे राजकारण सुरू झाले आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे स्वतः ‘ॲक्शन मोड’वर असून इतर मंत्रीही आपआपला वाटा उचलत असल्याचे दिसून येत आहे. भाजपकडून प्रचारात जोर लावला जात आहे.
य्यप्पा मंदिर, दुर्गा भाट या भागांना भेटी देऊन तेथील लोकांना भाजपला मतदान करण्याचे आवाहन केले. आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी नागझर, कोटवाडा या भागांना भेटी दिल्या, तर मंत्री सुभाष शिरोडकर आणि उपसभापती जोसुआ डिसोझा यांनी सिल्वानगरला भेट देऊन तेथील मतदारांना भाजपकडे वळविण्याचा प्रयत्न केला.
सध्या भाजपने तीन टीम तयार केल्या असून एका बाजूला उमेदवार रितेश नाईक घरोघरी फिरत असून दुसऱ्या बाजूला मंत्री, आमदार वेगवेगळ्या भागांना भेटी देत कोपरा बैठकांद्वारा भाजपला मत देण्यात काय फायदे आहेत, हे पटवून देताना दिसत आहेत. तर तिसऱ्या बाजूला मुख्यमंत्री स्वतः परिस्थितीचा आढावा घेत जी काही खिंडारे दिसत आहेत, ती बुजविण्याचा प्रयत्न करत आहेत.
याउलट काँग्रेसने घरोघरी फिरण्यावर भर दिला असून नियोजित कोपरा बैठका तसेच जाहीर सभाही रद्द करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या बुधवारी झालेल्या जाहीर सभेमुळे ‘आप’च्या कार्यकर्त्यात ‘जोश’ संचारला असून त्यांना ‘अभी दिल्ली दूर नही’ असे वाटायला लागले आहे.
हे पाहता सध्या तिन्ही पक्ष ‘अलर्ट’ झाल्यासारखे वाटत असले तरी मंत्री-आमदारांच्या सहभागामुळे होत असलेल्या चौफेर प्रचाराने भाजपने प्रचारात आघाडी घेतल्यासारखे वाटायला लागले आहे. आता ही आघाडी कितपर्यंत टिकते, हे कळायला प्रचाराच्या शेवटच्या टप्प्याची वाट पाहावी लागणार आहे, हे निश्चित.
सध्या फोंड्यात मुख्यमंत्र्यांची सकारात्मक देहबोली लोकांच्या आकर्षणाचा विषय ठरत आहे. मुख्यमंत्री मतदारांच्या प्रत्येक प्रश्नाला मुद्देसूद उत्तरे देत असल्यामुळे तोही एक चर्चेचा विषय ठरत आहे. आता यातून प्रत्यक्षात काय निष्पन्न होते ते बघावे लागणार असले तरी भाजप कार्यकर्त्यांच्या दृष्टीने मुख्यमंत्र्यांचे फोंड्यातील अस्तित्व ऊर्जा देणारे ठरत आहे, हे नक्की.
रितेश नाईक यांना भाजपची उमेदवारी दिल्यामुळे नाराज झालेले भाजपचे दक्षिण गोव्याचे सचिव विश्वनाथ दळवी यांनी स्वतःला प्रचारात झोकून दिल्याचे दिसून येत आहे. त्यांनी स्वतःबरोबर आपल्या कार्यकर्त्यांनाही प्रचाराला जुंपले असून वेगवेगळ्या भागांत होणाऱ्या प्रचारसभांतही ते भाग घेताना दिसत आहेत. यातून त्यांची नाराजी दूर झाल्याचे अधोरेखित होत असले तरी त्याचा खरा परिणाम ४ मे रोजीच कळणार आहे.
‘आप’नेही आता सक्रिय प्रचाराच्या रिंगणात उडी मारली असून बाबल्या खळी, हवेली, कोटवाडा या भागांत त्यांनी जोरदार झेप घेतल्याचे प्रत्ययाला येत आहे. आता ते कोणाला ‘हात’ दाखवितात आणि कोणाचा ‘हात’ पकडतात याचे उत्तर येत्या काही दिवसांतच मिळणार आहे.
काँग्रेसचे उमेदवार डॉ. केतन भाटीकर हे सध्या आपण आतापर्यंत केलेल्या समाजकार्याचा ‘वास्ता’ देत या कार्याची पावती आपल्याला या निवडणुकीत द्या, अशी मतदारांकडे मागणी करत आहेत. विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, खासदार विरियातो फर्नांडिस, आमदार एल्टन डिकॉस्ता, कार्लुस फेरेरा हेही अशाप्रकारची आवाहने करताना दिसत आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.