Goa BJP Viral Post: भारताचे शेजारील देश सध्या राजकीय, आर्थिक आणि सामाजिक अस्थिरतेचा सामना करत आहेत. बांगादेशनंतर आता नेपाळमध्ये राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे. तरुण आंदोलकांनी रस्त्यावर उतरुन के पी शर्मा ओली यांचे सरकार उलथवून लावले. याच पार्श्वभूमीवर गोवा भाजपने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन एक महत्त्वपूर्ण पोस्ट शेअर केली, ज्यात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारताच्या स्थिरतेची प्रशंसा केली. शेजारील देशांमधील अस्थिरतेला अधोरेखित करत त्या तुलनेत भारत किती मजबूत आणि अटळ आहे, हे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये ठामपणे नमूद केले.
गोवा भाजपने (BJP) आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, "आपले शेजारी पाकिस्तान, श्रीलंका, म्यानमार, बांग्लादेश आणि आता नेपाळ अस्थिरतेचा सामना करत असताना पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भारत मजबूत, स्थिर आणि अटळ उभा आहे." ही पोस्ट केवळ एक राजकीय विधान नसून देशातील सध्याची परिस्थिती आणि जागतिक स्तरावर भारताची वाढती प्रतिमा यावर भाष्य करणारी आहे. गोवा भाजपने या पोस्टच्या माध्यमातून देशाच्या परराष्ट्र धोरणाचे आणि अंतर्गत स्थैर्याचे एक मोठे यश अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे देशातील नागरिकांना सुरक्षेची भावना मिळते.
भारताच्या (India) शेजारील देशांमधील परिस्थिती गेल्या काही वर्षांपासून अत्यंत गुंतागुंतीची राहिली आहे.
पाकिस्तान: हा देश अनेक वर्षांपासून राजकीय अस्थिरता आणि गंभीर आर्थिक संकटाचा सामना करत आहे. वाढती महागाई, कर्जाचा डोंगर आणि राजकीय सत्तासंघर्ष यामुळे सामान्य जनतेचे जीवनमान अत्यंत कठीण झाले आहे.
श्रीलंका: श्रीलंकेने अलीकडेच इतिहासातील सर्वात मोठ्या आर्थिक संकटाचा अनुभव घेतला. इंधनाचा अभाव, जीवनावश्यक वस्तूंची वाढलेली किंमत आणि वाढत्या कर्जामुळे देशात मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक निदर्शने झाली, ज्यामुळे तत्कालीन सरकारला पायउतार व्हावे लागले.
म्यानमार: म्यानमारमध्ये राजकीय उलथापालथ झाली असून सत्तासंघर्षामुळे देशात अंतर्गत अशांतता वाढली आहे.
नेपाळ आणि बांग्लादेश: काही दिवसांपूर्वीच बांगालदेशातील शेख हसीना यांचे सरकार देशातील तरुण आंदोलकांनी उलथवून लावले. तर आता नेपाळमध्येही पंतप्रधान केपी शर्मा ओली यांच्या सरकारने प्रमुख सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर घातलेल्या बंदीमुळे देशभरात तरुणाईचा संताप उसळला. या बंदीविरोधात रस्त्यावर उतरलेल्या 'जनरेशन-झेड' (Gen-Z) च्या हजारो आंदोलनकर्त्यांनी के पी ओली यांना देश सोडून जाण्यास भाग पाडले.
गोवा भाजपने आपल्या पोस्टमध्ये केवळ शेजारील देशांची अस्थिरता दर्शवली नाही, तर पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भारताने केलेल्या प्रगतीवरही भर दिला आहे.
आर्थिक स्थिरता: आज भारतीय अर्थव्यवस्था जगातील चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली आहे. कठोर आर्थिक धोरणे आणि गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्याच्या धोरणामुळे भारताची अर्थव्यवस्था जागतिक आव्हानांना तोंड देण्यासाठी सक्षम झाली आहे.
राजकीय स्थैर्य: मोदी सरकारच्या काळात देशातील राजकीय स्थैर्याने एक नवा आदर्श प्रस्थापित केला आहे. बहुमताचे सरकार असल्यामुळे महत्त्वाचे धोरणात्मक निर्णय घेणे सोपे झाले आहे, ज्यामुळे देशाच्या विकासाला गती मिळाली आहे.
पायाभूत सुविधांचा विकास: गेल्या काही वर्षांत देशात रस्ते, रेल्वे, विमानतळ आणि डिजिटल कनेक्टिव्हिटीमध्ये मोठी प्रगती झाली आहे. या विकासामुळे देशांतर्गत व्यापार आणि उद्योग वाढण्यास मदत झाली आहे.
जागतिक स्तरावर वाढता मान: भारताचा जागतिक स्तरावरचा मान वाढला असून, अनेक आंतरराष्ट्रीय मंचांवर भारताची भूमिका अधिक प्रभावी झाली आहे. 'वसुधैव कुटुंबकम्' या तत्त्वावर आधारित भारताचे परराष्ट्र धोरण जागतिक शांतता आणि सहकार्यासाठी प्रयत्नशील आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.