फोंडा: पळसकट्टा येथील धनगर समाजाच्या महिलांनी आपल्या मागण्यांकडे प्रशासन आणि सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत तीव्र संताप व्यक्त केला आहे. आमच्या समस्या ऐकून घेतल्या जात नाहीत. उलट आम्हालाच घरे मोडण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. न्याय मिळणार नसेल तर आम्हाला विष द्या आणि मारून टाका, अशा संतप्त शब्दांत महिलांनी आपली व्यथा मांडली.
गेल्या दोन महिन्यांपासून पार्सेकर फूड्स प्रकल्पाविरोधात स्थानिकांकडून आंदोलन सुरू आहे. या प्रकल्पातून येणाऱ्या तीव्र दुर्गंधीमुळे गावात राहणे कठीण झाले असल्याचा आरोप महिलांनी केला. या घाण वासामुळे आमचे दैनंदिन जीवन असह्य झाले आहे. मुलांचे आरोग्य धोक्यात आले असून जनावरांनाही त्रास सहन करावा लागत आहे, असे आंदोलक महिलांनी सांगितले.
महिलांच्या म्हणण्यानुसार, प्रकल्प बंद करण्यासाठी त्यांनी विविध शासकीय कार्यालये आणि पंचायत स्तरावर निवेदने दिली. मात्र, त्यांच्या मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष करण्यात आले. दुसरीकडे, पार्सेकर यांच्या तक्रारींची मात्र प्रशासनाकडून तातडीने दखल घेतली जात असल्याचा आरोप करण्यात आला.
येथील घरांचे मोजमाप सुरू असल्याने स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आम्ही न्याय मागतोय; पण आम्हालाच बेघर करण्याची तयारी सुरू आहे, अशी खंत महिलांनी व्यक्त केली. या प्रकरणामुळे परिसरात तणाव वाढला असून प्रशासन व सरकारच्या भूमिकेकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.