मडगाव: पहेलगाम अतिरेकी हल्ल्यामुळे काश्मीरला जाणाऱ्या पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून गोव्यातही भीतीचे वातावरण तयार झाले आहे. याचाच परिणाम म्हणून गोव्यातील पर्यटकांनीही आपली तिकिटे रद्द करण्यास सुरुवात केली आहे.
गोव्यातील दोन टूर्स ॲन्ड ट्रॅव्हल कंपन्यांनी ३० एप्रिलपर्यंतचे आपले सर्व दौरे रद्द केले आहेत. ट्रॅव्हल बग टूर्स आणि जीएसी हॉलिडेस या दोन्ही कंपन्यांनी हा निर्णय घेतला आहे. काश्मीरला जाणे सुरक्षित हे जोपर्यंत केंद्र सरकार जाहीर केले जात नाही तोपर्यंत आमचे काश्मीर टूर्स बंद करण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे, अशी माहिती ट्रॅव्हल बग कंपनीचे मालक दक्षल नाईक यांनी दिली.
जीएसीचे व्यवस्थापकीय संचालक एहराज मुल्ला यांनीही आपल्या कंपनीने असाच निर्णय घेतला आहे, असे सांगितले. ३० एप्रिल पर्यंत ज्यांनी आपले विमानाचे तिकीट काढले होते, त्यांचे पैसे विमान कंपन्यानी परत दिले आहेत. पण, मे महिन्यात ज्यांनी तिकिटे बुक केली होती त्यांचे पैसे विमान कंपन्यांनी परत केलेले नाहीत, अशी माहिती संबंधितांकडून मिळाली.
उन्हाळी मोसमात गोव्यातून किमान ५०० पर्यटक काश्मीरला जातात. यावेळीही तसेच बुकिंग होते; पण पहेलगाम हल्ल्यानंतर पर्यटकांनी आपले बुकिंग्स रद्द करण्यास सुरवात केली आहे, अशी माहिती टीटीएजी या पर्यटन व्यवसायातील राज्यातील शिखर संघटनेचे माजी अध्यक्ष नीलेश शहा यांनी सांगितले.
वास्को येथील ट्रॅव्हल एजंट संजय शेटये यांनीही प्रवासी विमान तिकिटे रद्द करू लागले आहेत हे मान्य केले. आमच्या एजन्सीद्वारे काश्मिरची सहा तिकिटे बुक झाली पण आज ती रद्द केली. गोव्यातही भीतीचे पडसाद उमटले आहेत. त्यामुळे नजीकच्या काळात गोव्यातील लोक काश्मीरला जाणे टाळतील असेच वाटते, असे शेटये म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.