मोरजी, नगरनियोजन विभागाने पेडणे तालुक्यासाठी विभागीय आराखडा तयार करून मांद्रे गावावर अतिक्रमण केले. त्याविरोधात ॲड. रमाकांत खलप आणि मनोज परब यांनी आवाज उठवून ते पेडणेतील जनतेसोबत राहिले.
मात्र, खासदार श्रीपाद नाईक यांनी याविषयी भाष्य केलेले नाही. लोकसभेचा जो उमेदवार या अतिक्रमणाविरोधात राहू, असे पंचायतीला लिहून देईल, त्याच्यासोबत मांद्रे गाव राहील, अशी रोखठोक भूमिका मांद्रेचे सरपंच प्रशांत नाईक यांनी जाहीर केली आहे.
प्रशांत नाईक म्हणाले की, कोण निवडून येणार वा नाही, हे आम्ही सांगू शकत नाही; परंतु प्रत्येक उमेदवाराने नगरनियोजन विभाग करत असलेल्या सेटलमेंट झोनविरोधात राहण्याचे लेखी आश्वासन आम्हाला द्यावे. मांद्रे गावाच्या चारही बाजूंना डोंगर आहे आणि तेथेच व्यावसायिक बांधकाम होऊ लागले तर पर्यावरणाचा ऱ्हास होईल. पर्यावरण वाचविण्यासाठी नेत्यांकडून लेखी आश्वासन गरजेचे आहे.
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांना हे आव्हान दिल्याने कोण काय उत्तर देताे, हे पाहणे रंजक ठरणार आहे.
‘ते’ विध्वंसकारी कलम रद्द करा!
नगरनियोजन विभागाने कलम १७, उपकलम २ हे केवळ मांद्रे गाव संपविण्यासाठी आणले आहे. या कलमाचा वापर करून नगरनियोजन विभाग डोंगरावरील जागा सेटलमेंट झोनमध्ये रूपांतरित करत आहे.
विकासाला आमचा विरोध नाही; परंतु डोंगरावर विकास आम्हाला मान्य नाही. डोंगर कापले तर भविष्यात मुलांना कागदावर चित्र काढून डोंगर कसे होते, हे दाखविण्याची वेळ येईल. अशा बेकायदेशीर विकासाला ग्रामस्थांचा विरोध आहे आणि सरपंच म्हणून मी ग्रामस्थांसोबतच राहणार आहे, असे प्रशांत नाईक म्हणाले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.