मोरजी: गणेश चतुर्थीचा उत्सव नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला. दीड आणि पाच दिवसांच्या गणपती बाप्पाला निरोप देऊन भक्तांनी विसर्जन केले, मात्र या विसर्जनानंतर मूर्तींची होणारी दुरावस्था पुन्हा एकदा समोर आली आहे. मोरजीच्या समुद्रकिनाऱ्यावर पाच दिवसांच्या गणेश विसर्जनानंतर काही गणेशमूर्ती पुन्हा किनाऱ्यावर परत आल्याचे धक्कादायक चित्र पाहायला मिळाले.
या मूर्ती अर्ध्या तुटलेल्या आणि भग्न अवस्थेत किनाऱ्यावर पडल्या होत्या. समुद्राच्या लाटांसोबत वाळूत रुतलेल्या या मूर्ती पाहिल्यानंतर, त्यांचे व्यवस्थित विसर्जन झाले नाही, हे स्पष्ट झाले आहे. अनेक भक्तांनी पर्यावरणाची काळजी घेऊन शाडूच्या मातीची मूर्ती घेण्याला प्राधान्य दिले, पण विसर्जनानंतरची ही अवस्था पाहता, गणेशमूर्तीची एकप्रकारे विटंबनाच होत असल्याचे दिसत आहे.
गणेशोत्सव हा श्रद्धा आणि भक्तीचा उत्सव आहे. आपण बाप्पाची प्रतिष्ठापना करतो, त्याची मनोभावे पूजा करतो आणि नंतर त्याला निरोप देतो. पण मूर्तीची पूजा करण्यापूर्वी आपली जितकी जबाबदारी असते, तितकीच जबाबदारी त्याचे यथोचित विसर्जन करण्याचीही असते. योग्य पद्धतीने विसर्जन न झाल्याने या मूर्ती पुन्हा किनाऱ्यावर येतात म्हणूनच भक्तांनीही विसर्जन योग्य प्रकारे होईल याची काळजी घेणे आवश्यक आहे.
केवळ विसर्जन केले म्हणजे आपली जबाबदारी संपली असे नाही, तर बाप्पाचे यथोचित विसर्जन झाले की नाही हे पाहणे देखील महत्त्वाचे आहे. या घटनेमुळे पर्यावरण आणि श्रद्धा या दोन्ही गोष्टींचा आदर राखण्यासाठी योग्य विसर्जन पद्धतीची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. किमान यापुढे सात, नऊ आणि पुढील विसर्जनच्यावेळी याची काळजी घेऊन मूर्तींचे विसर्जन केले गेले पाहिजे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.