मडगाव, गोमंतकीयांच्या गरजा पूर्ण करणाऱ्या प्रकल्पांचे गोमंतकीयांनी नेहमीच स्वागत केले आहे. लोकांचा विरोध आहे, तो फक्त घोटाळेबाज प्रकल्पांना. अटल सेतू, कला अकादमी, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांसाठीच्या साधन-सुविधा, ‘स्मार्ट सिटी’ ही भाजप सरकारने उभारलेली स्मारके आहेत, त्यांनाच लोकांनी विरोध केला,असा असा सणसणीत टोला विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी हाणला आहे.
भाजपच्या सग्यासोयऱ्यांची तिजोरी भरण्यासाठी उभारलेल्या भ्रष्टाचाराच्या स्मारकांची काही प्रकल्प उदाहरणे आहेत, त्यांनाच लोकांनी मतदानातून विरोध केला, असा दावाही युरी यांनी केला.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ‘काहींना सरकारी प्रकल्पात अडथळे आणण्याची सवय आहे’ या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध करून विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी, भांडवलदारांना खूश करण्यासाठी आमच्यावर जबरदस्तीने लादलेल्या विनाशकारी प्रकल्पांना गोमंतकीय विरोध करतीलच, असे स्पष्ट केले आहे.
कोणताही प्रकल्प प्रस्तावित करताना सर्वांना विश्वासात घेणे आणि संपूर्ण पारदर्शकता ठेवणे हे शासनाचे कर्तव्य आहे. गेल्या ११ वर्षात भाजप सरकारने निकृष्ट दर्जाचे प्रकल्प तयार केले आहेत कारण कंत्राटदारांना, भाजपच्या भागधारकांना मोठ्या प्रमाणात कमिशन द्यावे लागते, असा दावा युरी आलेमाव यांनी केला.
भूतकाळातील काँग्रेस सरकारांनी नेहमीच गोमंतकीयांच्या भावनांचा आदर केला आणि तीन सेझ प्रकल्प आणि प्रादेशिक आराखडा लोकांच्या शक्तीपुढे नतमस्तक होऊन रद्द केले. काँग्रेसने नेहमीच गोमंतकीयांच्या भावना आणि आकांक्षांची काळजी घेतली आहे, असे युरी आलेमाव म्हणाले.
भाजप सरकारने पणजी ‘स्मार्ट सिटी’साठी जवळपास १५०० कोटी रुपये, कला अकादमीच्या दुरुस्तीवर ७५ कोटी, राष्ट्रीय खेळांवर १ हजार कोटी आणि ‘अटल सेतू’वर ७०० कोटी रुपये खर्च केले, परंतु कामाचा दर्जा अतिशय खराब झाल्याने नेहरू स्टेडियम, फातोर्डा येथील पत्रे उडणे, श्यामा प्रसाद मुखर्जी स्टेडियमच्या दर्शनी भागाची पडझड होणे, ‘अटल सेतू’वर तयार झालेले खड्डे, कला अकादमीचा स्लॅब कोसळणे आदी घटना घडल्या, याकडे युरी आलेमाव यांनी लक्ष वेधले.
भाजप सरकारच्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामामुळे शेकडो निष्पाप गोमंतकीयांचे प्राण गेले आहेत. विद्युत खात्यावर १२ हजार कोटी रुपये खर्च करूनही विजेच्या धक्क्याने ६५ व्यक्ती आणि १७ जनावरांचा मृत्यू झाला. बंच केबलिंग हा घोटाळा असल्याचे सिद्ध झाले आहे , असे युरी आलेमाव यांनी सांगितले.
लोकसभा निवडणूक निकालातून भाजपने धडा घ्यावा. २०२७ मध्ये नवीन इंजिन सरकार असेल हे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना मी स्पष्टपणे सांगू इच्छितो, असे युरी आलेमाव म्हणाले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.