

हडफडे येथे घडलेल्या नाईटक्लबमधील भीषण आगीच्या दुर्घटनेबाबत भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. या दुर्घटनेत अनेक तरुणांचे बळी गेले असून, त्यामध्ये सुट्टीसाठी आलेले पर्यटक तसेच आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवणारे कामगार यांचा समावेश असल्याचे त्यांनी नमूद केले.
ही घटना केवळ संबंधित कुटुंबांसाठीच नव्हे, तर संपूर्ण देशासाठी हानी असल्याचे त्यांनी सांगितले. न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले की, आयुष्यातील आनंदाचे क्षण अनुभवण्यासाठी आलेले पर्यटक आणि आपल्या कष्टावर कुटुंब चालवणारे युवक अशा प्रकारे काळाच्या पडद्याआड जाणे ही अत्यंत वेदनादायक बाब आहे.
या दुर्घटनेत ज्यांनी आपले आप्तस्वकीय गमावले आहेत, त्यांच्या दुःखात आपण सर्वजण सहभागी आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी बोलताना त्यांनी अमली पदार्थांच्या वाढत्या व्यसनावरही गंभीर चिंता व्यक्त केली. अमली पदार्थांचे व्यसन अनेकदा केवळ कुतूहलातून किंवा मित्रांच्या दबावाखाली शांतपणे सुरू होते, मात्र हळूहळू ते संपूर्ण कुटुंब, शिक्षण आणि समाजाचा नाश करते, असा इशारा त्यांनी दिला. युवकांनी अशा व्यसनांपासून दूर राहावे, असे आवाहन करत त्यांनी सांगितले की, व्यसन सुरुवातीला नियंत्रणात असल्याचा भास निर्माण करते, पण शेवटी ते आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त करते.
तरुण पिढी ही देशाची खरी ताकद असून, त्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी समाज, कुटुंब आणि यंत्रणांनी एकत्रितपणे काम करणे आवश्यक असल्याचेही न्यायमूर्ती सूर्य कांत यांनी अधोरेखित केले. अर्पोरा आगीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी संयम, जागरूकता आणि जबाबदारीची गरज असल्याचे स्पष्ट केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.