म्हापसा: मान्सूनचे आगमन अवघ्या काही दिवसांवर आले असताना, म्हापसा शहरातील मान्सूनपूर्व कामांना एक वेगळेच आणि धक्कादायक वळण मिळाले आहे. म्हापसा पालिकेच्या वॉर्ड क्र. ११ आणि ७ मध्ये कंत्राटी कामगार मध्यरात्रीच्या सुमारास चक्क मोबाईलच्या टॉर्चचा प्रकाश वापरून गटारे साफ करताना आढळून आले आहेत. अंधारात आणि प्रतिकूल परिस्थितीत सुरू असलेल्या या कामामुळे स्थानिक नागरिकांनी कामाच्या दर्जाबाबत तीव्र चिंता आणि प्रश्न उपस्थित केले आहेत.
कामाच्या दर्जासोबतच या रात्रीच्या मोहिमेत कामगारांच्या सुरक्षेकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचे समोर आले आहे. या कामगारांकडे कोणतेही आवश्यक सुरक्षा साधन नाही. रात्रीच्या अंधारात तुंबलेली गटारे साफ करताना कामगारांना सर्पदंश, फुटलेल्या काचा किंवा टोकदार लोखंडी वस्तू लागून दुखापत होण्याचा, तसेच घसरून पडण्याचा मोठा धोका असतो. किमान सुरक्षा साधनांशिवाय कामगार जीव धोक्यात घालून हे काम करत होते.
या आठवड्याच्या सुरवातीला मध्यरात्री उशिरा सुमारे ५ ते ६ कामगार कोणतीही पुरेशी प्रकाश व्यवस्था नसताना केवळ मोबाईलच्या उजेडात गटारांमधील गाळ काढत होते. हा प्रकार स्वतः पाहणारे वॉर्ड क्र. ७ मधील काही स्थानिक रहिवासी यांनी संताप व्यक्त करत, ‘फक्त नावापुरती गटार सफाई करून चालणार नाही, तर पावसाळा सुरू होण्यापूर्वी हे काम प्रभावीपणे होणे गरजेचे आहे. केवळ मोबाईलच्या प्रकाशात गटारांमधील चिखल, साचलेला कचरा किंवा अंतर्गत पडझड कोणाला कशी काय दिसणार आणि त्याची तपासणी कशी होणार? असे प्रश्न उपस्थित केले.
दरम्यान, या अजब कारभाराबाबत संबंधित कंत्राटदाराशी संपर्क साधला असता, त्याने रात्री काम करण्याचे कारण स्पष्ट केले. कंत्राटदाराने मान्य केले की, हे कामगार दिवसा इतर ठिकाणी व्यस्त असतात.
ते दिवसा एका बिल्डरकडे काम करत असल्याने, त्यांच्याकडे मान्सूनपूर्व गटार सफाईचे हे काम पूर्ण करण्यासाठी फक्त रात्रीचीच वेळ उपलब्ध आहे. परंतु, कंत्राटदाराच्या या स्पष्टीकरणामुळे स्थानिक नागरिकांचे समाधान झालेले नाही, उलट यामुळे पालिकेच्या एकूणच कारभारावर आणि देखरेखीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
सार्वजनिक निधीचा गैरवापर, प्रशासकीय उत्तरदायित्वाचा अभाव!
काम सुरू असताना घटनास्थळी नगरपालिकेचा कोणताही अधिकारी, इंजिनियर किंवा सुपरवायझर उपस्थित नसल्याचे नागरिकांनी निदर्शनास आणून दिले. यावर ‘गोवा कॅन’चे समन्वयक रोलंड मार्टिन्स यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे.
त्यांनी म्हटले की, जर घटनास्थळी कामाची तपासणी करण्यासाठी कोणताही इंजिनियर किंवा पर्यवेक्षक नसेल, तर गटारे योग्यप्रकारे साफ झाली आहेत की नाही हे कोण प्रमाणित करणार? हा प्रकार सार्वजनिक निधीचा गैरवापर व प्रशासकीय उत्तरदायित्वाचा अभाव दर्शवतो.
तसेच, गटार सफाईच्या कामामुळे दिवसा वाहतुकीला कोणताही मोठा अडथळा निर्माण होत नाही, त्यामुळे हे काम रात्री उशिरा करण्याची कोणतीही सबब पटण्यासारखी नाही, असेही मार्टिन्स यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.