म्हापसा: येथील शहर आणि शेजारील भागातील खड्डेमय आणि चाळण झालेले रस्ते अपघातप्रवण बनले आहेत. हे रस्ते येत्या गणेशचतुर्थीपूर्वी दुरुस्त आणि पूर्ववत करण्याची विनंती स्थानिक रहिवाशांनी मुख्यमंत्री, साबांखा अभियंता व नगरपालिकेसह विविध अधिकाऱ्यांना पत्र पाठवून केली आहे.
म्हापशातील रहिवासी गौरेश केणी यांनी म्हापसा शहरातील रस्त्यांच्या बिकट आणि असुरक्षित स्थितीविषयी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, नगरपालिका, साबांखा कार्यकारी अभियंता, म्हापसा वाहतूक पोलिस निरीक्षक यांना पत्र पाठवून लक्षात आणून दिली आहे. सध्या रस्त्यांची स्थिती आणखी हालाकीची झाली आहे. त्यामुळे रोज प्रवास करणारे विशेषतः ज्येष्ठ नागरिक, शाळकरी विद्यार्थी, दुचाकीस्वारांना या रस्त्यांमुळे धोका निर्माण झाला आहे, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे.
म्हापसा पालिका क्षेत्रातील प्रभागवार अंतर्गत रस्त्यांची ही प्रमुख समस्या आहे. तिथे मोठे खड्डे अवरतले आहेत अन् रस्त्यांची चाळण झाली आहे. म्हापसा बसस्थानक आवारातील रस्त्यावर ज्येष्ठांना दुचाकी चालवण्यास खूपच त्रास सहन करावा लागतो. जुने पालिका कार्यालय ते तारपर्यंतच्या रस्त्याची अक्षरशः वाताहात झाली आहे, असे केणी यांनी पत्रात नमूद केले आहे.
खड्डेमय झालेले रस्ते शहरात वाहन वाहतूक कोंडीला कारणीभूत ठरत आहेत. गणेशचतुर्थी उत्सवादरम्यान शहरात वाहन वाहतूक आणि पादचारांची मोठी रेलचेल असेल. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांना शहरातील सर्व खराब रस्ते दुरुस्त करण्याचे मुख्यमंत्र्यांनी निर्देश द्यावेत व या कामाकडे जातीने लक्ष द्यावे, जेणेकरून रस्त्यांची योग्य डागडुजी होईल व लोकांना रहदारीसाठी सुरळीत रस्ते मिळतील, अशी मागणी केणी यांनी वरील पत्रातून केली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.