पणजी, उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघात कॉंग्रेसचे उमेदवार ॲड. रमाकांत खलप यांचा पराभव कसा झाला, याची कारणमीमांसा पक्षाने सुरू केली आहे. पराभवानंतर त्याविषयी भाष्य करणे खलप यांनी आजवर टाळले आहे.
खलप यांना पक्ष संघटनेकडून अपेक्षित साथ मिळाली नाही का, सगळ्यांनीच दक्षिण गोव्यावर भर दिला होता का, ही कारणे शोधली जात आहेत. यासाठी दिल्लीतून काही जुने नेते-कार्यकर्त्यांशी संपर्क साधला जात असल्याची माहिती मिळाली आहे.
याबाबत खलप यांना विचारले असता ते म्हणाले, मी उमेदवारी मिळाल्यानंतर प्रामाणिकपणे सर्व मतदारांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न केला. झालेल्या आरोपांना समर्थपणे उत्तरे दिली. प्रचारात कोणतीही उणीव ठेवली नाही. तरीही यश का मिळाले नाही याची मीमांसा पक्षीय पातळीवर केली जावी. पक्ष संघटनेची जबाबदारी असलेल्या नेत्यांनी कोण कुठे कमी पडले हे जाणून घेऊन त्या चुका पुन्हा होणार नाहीत, याची काळजी घेणे अपेक्षित आहे.
कोणी काम केले, नाही हे सर्वांना ठाऊक
पक्षश्रेष्ठींनी आपल्या पातळीवर माहिती घेणे सुरू केल्याची माहिती मला मिळाली आहे. काहीजणांकडून दूरध्वनीवर माहिती घेतल्याचे मला समजले आहे. मी पराभवाची कारणमीमांसा जाहीरपणे करू इच्छीत नाही. राजकारण व समाजकारणाच्या या टप्प्यावर मला वाद निर्माण करायचे नाहीत. कोणी काम केले किंवा केले नाही याची माहिती सर्वांना आहे, ते मी सांगू इच्छीत नाही, असेही खलप म्हणाले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.