Vote to save Goa  
गोवा

Vote to save Goa : गोवा वाचविण्‍यासाठीच मतदान करा; ‘गोमन्‍तक टीव्‍ही’च्‍या निवडणूक महाचर्चेत वक्‍त्‍यांचा सूर

गोमन्तक डिजिटल टीम

Vote to save Goa

मडगाव, : गोवा हे लहान राज्‍य असले तरी येथील प्रश्‍‍न माठे आहेत. वेगवेगळे प्रकल्‍प आणि विकासाच्‍या नावाखाली येथील जमिनी मोठ्या प्रमाणावर व्‍यापल्‍या जातात. त्‍यामुळे स्‍थानिक उपरे होणार की काय, अशी भीती निर्माण झाली आहे.

गोव्‍याकडे ज्‍या गंभीरतेने केंद्र सरकारकडून पाहिले जाण्‍याची गरज होती, तसे झालेले नाही. आता लोकसभा निवडणूक तोंडावर आली आहे. अशा वेळी गोवा वाचविण्‍यासाठीच मतदारांनी मतदान करण्‍याची गरज गोमन्‍तक टीव्‍हीने आयोजित केलेल्‍या ‘निवडणूक महाचर्चेत’ व्‍यक्‍त करण्‍यात आली.

या महाचर्चेचे आयोजन मडगावात करण्‍यात आले होते. ‘गोमन्‍तक’चे संपादक-संचालक राजू नायक यांनी ही चर्चा संचालित केली. या चर्चेत राजकीय भाष्‍यकार क्‍लिओफात आल्‍मेदा कुतिन्‍हो, पर्यावरण चळवळीतील आघाडीचे कार्यकर्ते अभिजीत प्रभुदेसाई, अविनाश तावारीस, युवा एसटी नेते रवींद्र वेळीप, काँग्रेसचे अमरनाथ पणजीकर, सावियो कुतिन्‍हो, गोवा फॉरवर्डच्‍या अश्‍‍मा सय्‍यद, भाजपचे गिरीराज पै वेर्णेकर आणि सावियो रॉड्रिगीस यांनी भाग घेतला.

या चर्चेची सुरुवात काँग्रेस उमेदवार कॅप्‍टन विरियातो फर्नांडिस यांनी ‘भारतीय संविधान गोमंतकीयांवर लादले गेले’ असे जे वक्‍तव्‍य केले होते, ते योग्‍य होते की अयोग्‍य, या मु‍द्यावरून झाली. ही अलगवादाची भाषा, अशी प्रतिक्रिया सावियो रॉड्रिगीस यांनी व्‍यक्‍त केली.

गोव्‍यात विकासाच्‍या नावाने सध्‍या जे काय चालले आहे ते गोमंतकीयांच्‍या कल्‍याणासाठी की अन्‍य कारणांसाठी? असा सवाल गोवा फॉरवर्डच्‍या अश्‍‍मा सय्‍यद यांनी करताना, या तथाकथित विकासामुळे गोमंतकीयांना खराच फायदा होतो का असा मुद्दा उपस्‍थित केला.

तर, रवींद्र वेळीप यांनी गोव्‍यातील जमिनी स्‍थानिकांसाठी राखून ठेवायच्‍या असतील तर ताबडतोब अनुसूचित प्रदेश या कायद्याचा अवलंब करून गावाच्‍या लोकांसाठी जमिनी राखून ठेवण्‍याची गरज व्‍यक्‍त केली. सध्‍या जो विकास सुरू आहे, त्‍यात ग्रामीण जनतेचा विचारच केला जात नाही असा आरोप करून हे सर्व मुद्दे निवडणुकीच्‍या काळात चर्चेला येण्‍याची गरज व्‍यक्‍त केली.

काँग्रेसचे अमरनाथ पणजीकर यांनी भाजपवर आरोप करताना, सध्‍याच्‍या सरकारने गोवा विक्रीला काढला असून तो गोवेकरांसाठी राखून ठेवण्‍यासाठी भाजपला सत्तेतून बाहेर ठेवण्‍याची गरज व्‍यक्‍त केली. तर सावियो कुतिन्‍हो यांनी तोच मुद्दा उचलून धरताना, भाजपची धोरणे लोकविरोधी असल्‍याचा आरोप केला.

पंतप्रधानांच्‍या आश्‍‍वासनाचे काय झाले?

गोव्‍याचे हित राखण्‍यासाठी भारतीय संविधानात काही बदल करणे आवश्‍‍यक आहे का, हा मुद्दा चर्चेत आला असता क्‍लिओफात आल्‍मेदा कुतिन्‍हो यांनी, सध्‍या गोव्‍यातील जमिनी इतर राज्‍यांतील व्‍यावसायिकांकडून व्‍यापल्‍या जात आहेत.

या जमिनींचे रक्षण करणे ही आता काळाची गरज बनली असून त्‍यासाठी भारतीय राज्‍यघटनेत बदल करून गोव्‍याला खास दर्जा देण्‍याची गरज व्‍यक्‍त केली. तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यापूर्वी गोव्‍याला खास दर्जा देणार, असे आश्‍‍वासन दिले होते. मात्र नंतर त्‍या आश्‍‍वासनाचे पालन झाले नाही, असा आरोप अविनाश तावारीस यांनी केला.

गोव्याच्या हिताला प्राधान्य हवे

स्‍थानिकांना रोजगार, जमिनींचे रक्षण, स्‍थानिक अस्‍मिता हे मुद्दे निवडणुकीच्‍या दरम्‍यान चर्चेत येऊन हे सर्व मुद्दे राजकीय पक्षांच्‍या जाहीरनाम्‍यात यायला पाहिजेत असाही सूर या चर्चेतून पुढे आला. सर्वांत महत्त्वाची गोष्‍ट म्‍हणजे, जो पक्ष गोवा वाचवेल त्‍यालाच मतदारांनी मतदान करण्‍याची गरज या चर्चेत व्‍यक्‍त करण्‍यात आली.

भारतीय संविधानाबाबत कॅप्‍टन विरियातो फर्नांडिस जे बोलले, त्‍यात काहीच गैर नाही. गोव्‍याला मुक्‍ती देताना गोमंतकीयांचे म्‍हणणे ऐकून घेऊन ईशान्‍य भारतातील राज्‍यांप्रमाणे खास दर्जा देणे आवश्‍‍यक होते. मात्र त्‍यावेळी गोमंतकीयांचे मत लक्षात न घेताच आम्‍हाला भारतात सामील केले आणि ती गोष्‍ट चुकीची होती.

- अभिजीत प्रभुदेसाई, पर्यावरणप्रेमी

सैन्‍यात सेवा दिलेले कॅप्‍टनच जर भारतीय राज्‍यघटनेबाबत अशी भाषा बोलत असतील तर ती निंदनीय आहे. प्रत्‍येकाने बोलताना विचार करायला हवा. आपल्‍या विधानाचा पुढे काय परिणाम होऊ शकतो, हे जाणले पाहिजे. उचलली जीभ लावली ताळ्‍याला असे होता कामा नये. कारण त्‍यामुळे खूप प्रश्‍‍न निर्माण होऊ शकतात.

- गिरीराज पै वेर्णेकर, भाजप प्रवक्ते

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ponda: बहिणीने धाडस केले पण भाऊ बचावला नाही; 17 तासानंतर आढळला दर्शन नार्वेकरचा मृतदेह

मेरशीत एक महिन्यापासून उभ्या जीपमध्ये आढळला मृतदेह, परिसरात खळबळ; गोव्यातील ठळक बातम्या

Goa Belgaum Highway: गोवा-बेळगाव महामार्गावरील वाहतूक ठप्प, दोन्ही बाजूला 4-5 किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा

Divar Island: पाचव्या शतकातील निर्मिती प्रक्रिया वापरुन गोव्यात उभारलं जातंय जहाज; पुढल्या वर्षी करणार गुजरात ते मस्कत प्रवास

Funny Viral Video: 3 वर्षापासून पैसे साठवून 4 मित्र गोव्याला निघाले, टोल भरण्यातच खिसे रिकामे झाले

SCROLL FOR NEXT