Damage to paddy fields in Goa Due To rRain Dainik Gomantak
गोवा

Goa Monsoon: गोव्यात बळीराजा चिंताग्रस्त! परतीच्या पावसाने हाहाकार; भातशेतीची पुन्हा नासाडी

Goa Rain: पाऊस मित्र की शत्रू, असा प्रश्‍न आता बळीराजाला पडला आहे. जेव्हा भातशेतीला सुरवात केली तेव्हा पावसामुळे तरवा कुजून गेला. त्यानंतर शेतकऱ्यांनी परत लागवड केली. मात्र, आता जेव्हा भातशेती कापणीला आल्यानंतर परतीचा पाऊस काळ बनून बरसत आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Farmers Suffer Major Losses Due to Unexpected Rainfall in Goa

म्हापसा: पाऊस मित्र की शत्रू, असा प्रश्‍न आता बळीराजाला पडला आहे. जेव्हा भातशेतीला सुरवात केली तेव्हा पावसामुळे तरवा कुजून गेला. त्यानंतर शेतकऱ्यांनी परत लागवड केली. मात्र, आता जेव्हा भातशेती कापणीला आल्यानंतर परतीचा पाऊस काळ बनून बरसत आहे. त्यादृष्टीने राज्यातील परिस्थितीचा घेतलेला आढावा.

सध्या बार्देश तालुक्यात कापणीला सुरवात झाली असून, सुरवातीला पेरणीवेळी पडलेल्या मुसळधार पावसामुळे अनेकांनी नुकसानभरपाईसाठी अर्ज केले होते. त्यानुसार शेतकरी आधार निधीअंर्तगत ज्या शेतकऱ्यांनी याचा आधी लाभ घेतला अशांना पुन्हा नुकसानभरपाई मिळणार नाही. त्याचप्रमाणे, भातपिके आडवी झाल्याने यांत्रिक कापणीला नियमित वेळेपेक्षा थोडा अधिक वेळ सध्या लागत आहे. गेले काही दिवस सुरु असलेल्या परतीच्या पावसामुळे उभे भातपीक आडवे होण्यास सुरवात झाली असली तरी चिंतेचे कारण नाही, अशी माहिती बार्देश विभागीय कृषी कार्यालयातून मिळाली आहे.

बार्देश यांत्रिक लागवड विभागातून प्राप्त माहितीनुसार, सध्या पावसामुळे भात कापणीला काहीशी अडचण येत आहे. कारण, भातपिके आडवी झाल्याने ती जड आहेत. याशिवाय शेतात पाणी साचलेले आहे. यंत्राद्वारे कापणीसाठी पिके उभी हवी असतात. मात्र, पिके आडवी असल्याने भातकापणीस किंचित अवधी अधिक लागतोय. सध्या परिस्थिती तशी नियंत्रणाखाली आहे.

विशेषतः पाऊस रात्रीच्या वेळी पडत असल्याने मोठा परिणाम झालेला नाही किंवा तशी तक्रार आमच्यापर्यंत तरी शेतकऱ्यांनी केलेली नाही. काही दिवसांनंतर स्थितीचा अचूक अंदाज मिळेल, असे अधिकाऱ्यांनी नमूद केले.

सध्या बार्देश विभागीय कृषी कार्यालयाकडे नेरुलमधून एकमेव शेतकऱ्याचा नुकसान भरपाईसाठी अर्ज आला आहे. दोन-तीन दिवसानंतर, स्थितीमध्ये अधिक स्पष्टता येईल, असे कृषी कार्यालयातील अधिकाऱ्यांनी सांगितले. पावसाचा जोर असला तरी, अद्याप स्थिती हाताबाहेर गेली नसल्याचे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. सध्या भातकापणीलादेखील सुरवात झाली असून, बार्देशातील अधिकतर ठिकाणी कापणीचा श्रीगणेशा झाला आहे. दहा दिवसांपासून तालुक्यात सर्वत्र कापणीला जोर आला आहे.

बार्देशात ४० यंत्रे

यांत्रिक लागवड विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले की, आम्ही यांत्रिक कापणीला तासाला २८०० रुपये शुल्क घेतो. यात सरकारकडून शेतकऱ्यांना थेट १४०० रुपयांची सबसीडी मिळते. तसेच शेतकऱ्यांच्या मागणीनुसार, सरकारने आता १ हेक्टरच्या कापणीला अतिरिक्त ४५ मिनिटे दिली आहेत. आधी हा वेळ २.५ तास होता, असेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. बार्देश तालुक्यात कापणीसाठी ४० यंत्रे उपलब्ध असून, यात चार मुख्य सेवा प्रदात्यांचा समावेश आहे.

ज्योती भाताला पसंती

बार्देशात अधिकतर शेतकरी हे ज्योती भाताचे पीक घेतात. या पिकाचा कालावधी ११५ दिवसांचा असतो. सुरवातीला मुसळधार पावसामुळे अनेक शेतकऱ्यांना फटका बसला होता. त्यानुसार बार्देशातून जवळपास हजारपेक्षा अधिक शेतकऱ्यांनी कृषी कार्यालयाकडे नुकसान भरपाईचे अर्ज केले होते. त्यानंतर, काहींनी पुन्हा तरवा लागवड केली, तर काहींनी पिक घेतले नाही. आता कापणीच्या हंगामाला सुरवात झाली असून, हा हंगाम संपल्यानंतरच बार्देशात नेमकी किती जमीन लागवडीखाली आली होती, हे समजेल. बार्देशात ३५०० ते ३८०० हेक्टरमध्ये लागवड होते.

पावसाचा तडाखा कायम राहिल्यास नुकसानच

परतीच्या वाटेवर असलेल्या पावसाने कहर केल्याने डिचोलीतील काही भागात भातपीक आडवे झाले असून, भातशेती पीक नासाडीच्या मार्गावर आहे.

बुधवारी सायंकाळपासून रात्री उशिरापर्यंत जोरदार पर्जन्यवृष्टी होऊन बोर्डे, मये, पिळगाव आदी भागात काही प्रमाणात भातशेती आडवी झाली आहे. यामुळे बळीराजा हताश तेवढाच चिंताग्रस्त बनला आहे. त्यातच हवामान खात्याने आज ‘यलो अलर्ट’ जाहीर केल्याने शेतकरी पुरते हवालदील झाले आहेत. दुसऱ्याबाजूने गेल्या दोन दिवसांपासून तडाखा दिलेल्या पावसामुळे डिचोलीतील काही भागात भातशेती आडवी झाली असली तरी आतापर्यंत मोठीशी हानी झालेली नाही. मात्र, पुढील दोन-तीन दिवस पावसाचा जोरदार तडाखा बसल्यास भातपीक धोक्यात येऊन मोठी नुकसानी होण्याची शक्यता आहे, असा दावा कृषी खात्याने केला आहे.

दरम्यान, शेतकऱ्यांनी कृषी खात्याच्या अधिकाऱ्यांकडून शेतीची पाहणी करून नासाडीचा अहवाल तयार करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.

फोंड्यात भातशेती आडवी

संततधार पावसाने राज्याला सध्या झोडपले असून शेतीबागायतीचे मोठे नुकसान झाले आहे. पण राज्य सरकारच्या कृषी खात्याने शेतकरी व बागायतदारांना आर्थिक मदत करून दिलासा दिला असला तरी आता कापणीसाठी तयार झालेली भातशेती आणि बागायतीतील भाजी कुजू लागली आहेत. त्यामुळे आता कुणाकडे धाव घ्यावी, असा प्रश्‍न शेतकरी आणि बागायतदारांसमोर उभा आहे.

फोंडा तालुक्यात पावसाच्या सुरवातीलाच शेतीत पाणी भरल्याने मोठ्या प्रमाणात शेती कुजली होती. त्यातून थोडीफार तग धरून राहिलेली शेती आता कापणीच्या वेळेला आडवी झाल्याने नुकसान होत आहे. त्यामुळे बागायती आणि शेतीवर पावसाचा विपरित परिणाम होत आहे. एवढे कष्ट करूनही जर निसर्गाकडून अपेक्षित सहकार्य मिळाले नाही, तर मग करायचे काय, या विवंचनेत शेतकरी आहेत.

फोंडा तालुक्यात पिकलेली शेती आडवी झाली असून भाताच्या लोंब्या गळू लागल्यामुळे मोठे नुकसान शेतकऱ्यांना झाले आहे. पाऊस रोज संध्याकाळी कोसळत असल्याने आडवी झालेली भातशेती कापण्यासाठी वेळच देत नाही. त्यातच भात कापणीसाठी मजुरांची वानवा असल्याने शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत.

राज्यातील व्यावसायिकांचे नुकसान

परतीच्या पावसामुळे अनेकांची धावपळ उडाली आहे. भातशेतीचे नुकसान होत आहे, पर्यटकांची वर्दळ कमी झाली, रस्त्यांमुळे वाहनचालकांची फरपट तर शॅक्स व्यावसायिकांचे नुकसान झाल्याने तीव्र चिंता व्यक्त होत आहे.

गेले दोन दिवस पावसामुळे अनेक घर व इमारत बांधकामे करणाऱ्या लोकांना मनस्तापाचे झाले. काहींनी घरांचे बांधकाम हाती घेतले होते. मात्र, पावसाच्या अचानक आगमनामुळे त्यांची तारांबळ उडाली. घरांचे छप्पर उघडे पडल्याने तसेच सिमेंट वाया गेल्याने नुकसानी सोसावी लागली. शेतकऱ्यांची मोठी दमछाक झाली. चांगले पीक आल्याचे समाधान अल्प काळ टिकले व दमदार पावसामुळे शेतीची अपरिमित हानी झाली. पाण्यात पडल्याने भातशेती उत्पादन नुकसानीचे झाल्याचे नागरिक तुकाराम गावडे यांनी सांगितले.

रस्त्यांची स्थिती दयनीय बनली असून, खड्ड्यांत पाणी साचून राहते, त्यामुळे खड्ड्यांचे परिणाम कळत नाहीत. चोपडे ते केरी प्रमुख रस्त्याची चाळण झाली असून, कित्येकांना वाहनाचे नुकसान व मणक्याचे आजार उद्भवले आहेत. रस्त्यात इतके खोल खड्डे केवळ पावसामुळे नसून, बांधकाम खात्याच्या दुर्लक्षामुळे आहेत. कंत्राटदार व्यक्तीने निकृष्ट दर्जाचे काम केले, असे मत संतप्त वाहनचालक नीलेश हरमलकर यांनी व्यक्त केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT