Goa Gaude And Tribal Community History canva
गोवा

Goa History: रक्षणकर्त्या 'गावड्यांना' गोमंतकीय इतिहासाच्या पुस्तकात स्थान हवेच!

Goa Purification History: त्याकाळच्या रक्षणकर्त्या गावड्यांच्या समाधीला आज आम्ही ‘देवाचे झाड’ म्हणतो तर त्याच्या आत्म्याला ‘जाग्याचा राखणदार’. या राखणदाराला गोमंतकीय इतिहासाच्या क्रमिक पुस्तकात स्थान हवेच! नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी राज्यात टप्प्याटप्प्यांत होत आहे. या धोरणात इयत्तांचे पुनर्रचना, शिक्षण मूल्याकन या व्यतिरिक्त स्थानिक व व्यावहारिक ज्ञान याला महत्त्वाचे स्थान आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa's Curriculum to Include Significance of Gaude and Tribal Communities and Purification Practices

डॉ. मधू घोडकिरेकर

शुद्धीकरणामुळे नवी जात निर्माण तयार केली, असे म्हणणे चुकीचे आहे. डॉ. परागनी नमूद केलेली ती नावे पाहिल्यास कळेल की या लोकांनी अशा चळवळीतील लोकांना लक्षात आणून दिले की गोव्यात अजून एक समूह आहे ज्यांनी अद्याप ख्रिस्ती पद्धत पत्करलेली नाही. पण आपल्याच समाजाकडून शिवाशिवीचा सामना करावा लागल्याने ते अप्रत्यक्षपणे अस्पृश्यतेचेच जीवन जगत आहेत. हा ‘शुद्धीकरण’ विधी ‘बाटकेपणा’चा शिक्का पुसण्यासाठी होता.

नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी राज्यात टप्प्याटप्प्यांत होत आहे. या धोरणात इयत्तांचे पुनर्रचना, शिक्षण मूल्याकन या व्यतिरिक्त स्थानिक व व्यावहारिक ज्ञान याला महत्त्वाचे स्थान आहे. जगभराचे समुद्र, देशभरच्या नद्या यांच्या माहितीसोबत माझ्या घरासमोरून वाहणारा ओहोळ आपल्या भूगोलच्या पुस्तकात दिसला पाहिजे.

दै. ‘गोमन्तक’मधील मधू गावकर यांचे ‘जाऊ ओहोळांच्या गावा’ हे सादर वाचा व सोबत पौर्णिमा केरकरताईंचे विविध देवाच्या झाडांच्या माहितीचे सदरही वाचा. खरा स्थानिक भूगोल व इतिहास म्हणजे काय हे कळेल. या धोरणात आदिवासीविषयी काही विशेष तरतुदीही आहेत, ज्यात त्यांच्या बोलीतून प्राथमिक शिक्षण, त्यांचा त्यांचा स्वत:चाही इतिहास असावा, अशा गोष्टींचा समावेश आहे. याचाच अर्थ असा की आता नव्या स्वरूपात स्थानिक इतिहास लिहावा लागेल.

आता हा अगदी स्थानिक स्तरावरील इतिहास तयार करताना काय वादळे घोंघावतील, याचा प्रत्यय दै. ‘गोमन्तक’चे संपादक राजू नायक यांच्या ‘शुद्धी’ या लेखावर चर्चात्मक स्वरूपाची एक छोटीशी लेख साखळी तयार झाली त्यावर नजर टाकल्यावर येते. यावर एक ‘केस स्टडी’ म्हणून विचार करता येतो.

या साखळीची सुरुवात या दैनिक ‘गोमन्तका’चे संपादक राजू नायक यांच्या ‘शुद्धी’ या लेखाने झाली. त्यावर गाकुवेधाचे संस्थापक सदस्य गोविंद शिरोडकर विश्लेषणरूपी तीन प्रदीर्घ लेख लिहिले. साखळी येथे संपली नाही तर गोविंद शिरोडकरच्या लेखावर अजून एक लेख व दोन वाचकांची पत्रे प्रसिद्ध झाली आहेत. ‘शुद्धी’ हा लेख गोवा विद्यापीठच्या सामाजिक विज्ञान व वर्तन अभ्यास विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. पराग पोरोब यांच्या एका शोधनिबंधाच्या काही टिप्पण्यांवर आधारित आहे.

गोव्यातील विद्यार्थ्यांचा कल अभियांत्रिकी वैद्यकीय शिक्षणापाठोपाठ भाषा, विज्ञान व वाणिज्य शाखांत पदव्युत्तर शिक्षणाकडे असतो. सामाजिक विज्ञान म्हणजे इतिहास भूगोल या विषयांकडे जास्त लोक वळत नाही. मळलेली वाट सोडून वेगळ्या वळणाने जात गोमंतकीय डॉ. पराग पोरोब यांनी हे क्षेत्र निवडले असावे.

आज ते गोवा विद्यापीठाच्या या सदर विभागात सहयोगी प्राध्यापक तथा सहअधिष्ठातापदी पोहोचले आहेत, यावरून या क्षेत्राला गोव्यात महत्त्व आहे हे दिसून येते. गोव्याचा हजारो वर्षांचा इतिहास उभा करायचा असेल तर या विषयातील उच्च शिक्षणाला सर्व स्तरातून प्रोत्साहन द्यावे लागेल.

डॉ. पराग पोरोबच्या मूळ निबंधाचा विषय ‘गोमंतकातील देवळे’ हा असून आदिवासींच्या देवी सांतेरीच्या शेजारी इतर देवी, देव का व कधी आले, यावर त्यात भाष्य आले आहे. यात चिंबल येथे विपन्नावस्थेत असलेल्या राम, गणेश व हनुमान या मूर्ती असलेल्या एका देवळीची (लहान देवळाला देवळी म्हणतात) ऐतिहासिक माहिती देताना येथे झालेला गावडा शुद्धीकरणाचा इतिहास सांगितला. यात आलेल्या माहितीवर स्वत:चे थोडे भाष्य करीत तयार झालेला लेख म्हणजे दै. ‘गोमन्तक’च्या मर्मवेध या सदरात प्रसिद्ध झालेला ‘शुद्धी’ हा लेख.

आपल्या इतिहासाला चुकीच्या पद्धतीने दाखवू नका, असे म्हणत गाकुवेधचे गोविंद शिरोडकर यांनी एक प्रदीर्घ लेख लिहिला, जो तीन भागांत प्रसिद्ध झाला. हे लेख वाचल्यावर, ‘तुमचे लिहिताना आमच्याबद्दल चुकीचे लिहू नका’ असे सुचविणारे महेश मधुकर काळे यांचे पत्र व अजित मळकर्णेकर यांचा लेख प्रसिद्ध झाला. ‘आदिवासी म्हणजे हिंदू नाही असे म्हणणे चुकीचे’ असे सुचविणारे विवेक कामात यांचे वाचकपत्रही प्रसिद्ध झाले.

इतिहासाचा हत्ती जर आपल्याला पेलायचा असेल तर आपण सहा आंधळे होऊन चालत नाही. नाहीतर याच हत्तीला, शेपटावरून एकजण साप म्हणेल, तर दुसरा कानावरून सूप म्हणेल. इतिहासातील घटनांचे वर्तमानात विश्लेषण करताना डोळसपणाने पाहावे लागते, नाहीतर चुकीचे संदेश जाऊ शकतात.

आता या चर्चेचा विषय हा हत्तीच आहे असे मानूया. आता हत्तीची इतर चारपायी जनावरापेक्षा ओळख ही त्यांची सोंड आहे. या सोंडेला डोळे मिटलेला एक मोठ्ठी नळी म्हणू शकतो. असेच येथेही झाले. ‘शुद्धीकरण’ व ‘धर्मांतर’ यात गफलत केली. बऱ्याच धर्म-पंथात प्रवेश करण्याचे विधी असतात. जसे हिंदू धर्मात ‘मुंज (उपनयन) विधी’ किंवा ख्रिस्ती धर्मात ‘बाप्तिस्मा’.

या विधीत आपण या धर्मातील विधी नियमांचे पालन करेन, असे वचन घेतले जाते. आपण कोण आहे हे त्याचा मनात रुजविले जाते. लग्न हाही असाच विधी आहे ज्यामध्ये आपण एकमेकाच्या जीवनात प्रवेश करताना एकमेकांविषयी कोणत्या विधी नियमांचे पालन केले जाणे अपेक्षीत आहे याचे वचन घेतले जाते. मुंडारी जमात पद्धतीत लग्नविधी आहे ‘मुंज (उपनयन) विधी’ सारखा विधीच नाही.

जेव्हा बळजबरी धर्मांतर झाले, ते टिकवून ठेवण्यासाठी पोर्तुगिजांनी पुरोहितांचा या लोकांकडील संपर्क तोडला. शिरोडकर विचारतात की उच्चभ्रू लोकांचे का शुद्धीकरण का केले नाही, याचे उत्तर येथेच मिळते. आता ज्यांची ‘जानवे’ ही आजही ओळख आहे त्यांना पाठोपाठ पंधरा वीस पिढ्या त्यांना ‘मुंज’च्या बदल्यात ‘बाप्तिस्मा’ तेव्हा ते तनमनाने परत न येण्याजोगे ख्रिस्ती झाले. आदिवासींत या प्रथाच नाहीत, त्यामुळे पुरोहिताची त्यांना गरजच नाही. बाप्तिस्मा करण्यापासून चर्चला चुकविले की झाले. पण त्यांची अडचण वेगळी होती.

आदिवासीत सोवळ्याओवळ्याबाबत नियम अतिशय कडक व कर्मठ. समजा अशी अफवा फसली की अमुक अमुक विहिरीत मांसाचा तुकडा टाकला आहे. आता ज्या ज्या माणसांनी ते पाणी प्याले तर ते लोक वाळीत आणि विहीर शापित. असा लोकांना ‘बाटके’ असे नाव पडायचे. या लोकांचा समूह पुढील तीनशे-साडेतीनशे वर्षे एका गावातून दुसऱ्या गावात असा भटकत, प्रवास करत राहिला.

भूमिहीन व आसरा नाहिसा झाल्याने, गेलेल्या गावातील बागायतदाराकडे झोपडीवजा आसरा घेऊन तो रोजंदारीवर राहिला. पुढे कधी तरी कुठे तरी त्यांना स्थिरता आली, ज्याला पुढच्या काळात ‘मुंडकार कूळ’ अशी नावे पडली. १९२०चा काळ येईस्तोवर मुख्य आदिवासी प्रवाहाने स्वीकारले नाही, तरी त्यांचे स्वत:चे समसंस्कारी समूह तयार झाले होते. त्यामुळे शुद्धीकरणामुळे नवी जात निर्माण तयार केली, असे म्हणणे चुकीचे आहे.

१९२०चा काळ हा शाहू महाराजांच्या प्रयत्नातून पुढे आलेल्या अस्पृश्यता निवारण चळवळीचा मोठा काळ. शुद्धीकरण विधी घडवून आणण्यास पुढाकार घेणाऱ्याची जी नावे डॉ. परागनी नमूद केलेली ती नावे पाहिल्यास कळेल की या लोकांनी अशा चळवळीतील लोकांना लक्षात आणून दिले की गोव्यात अजून एक समूह आहे ज्यांनी अद्याप ख्रिस्ती पद्धत पत्करलेली नाही. पण आपल्याच समाजाकडून शिवाशिवीचा सामना करावा लागल्याने ते अप्रत्यक्षपणे अस्पृश्यतेचेच जीवन जगत आहेत.

हा ‘शुद्धीकरण’ विधी ‘बाटकेपणा’चा शिक्का पुसण्यासाठी होता. सोयर-सुतक या विटाळ काळातून बाहेर पडण्यासाठी विधी करतात तसाच तो विधी होता. चौथ्या दिवसाच्या आंघोळीने मासिक पाळीचा विटाळ काळ संपतो असे अशी भावना हिंदू स्त्रियांत असते, तीच भावना शुद्धीकरणच्या वेळी आंघोळ केलेल्यांना आदिवासी गावड्यांना झाली होती. उर्वरित आदिवासींना हा विधी पटला नाही, शिवाशिव त्यानंतरही चालूच राहिली. याचा या समूहाला फरक पडला नाही, मिळालेल्या आत्मविश्वासावर त्याने स्वत:चे शिमगो, मांड, जागर मांड तयार केले.

मुक्तीनंतरच्या काळात अशा जागी राम, गणेश, लक्ष्मी व हनुमान यांची छोटीमोठी मंदिरे उभारली जाताहेत. माझ्या गावात अशी तीन मंदिरे आहेत. ‘नव हिंदू’ ‘नव गावडे’ ही नावे दुसऱ्या कोणीही दिली नसून ‘ते आमचे नाही’ या संभाषणातून पुढे झालेली आहेत.

पुढचा प्रश्न येतो तो हाच, आदिवासी हा हिंदू आहे की नाही. आदिवासी दर्जा मिळविण्यासाठी आपण इतर धर्मांपासून वेगळे आहोत हे दाखवावे लागते. जसे अभिजात भाषेसाठी दोन हजार वर्षांचे पुरावे द्यावे लागतात, तसेच काहीसे पुरावे द्यावे लागतात. काळे व मळकर्णेकर यांनी आदिवासी करतात तसे रोट-विडीचे विधी करतात म्हणून आपणांना गावडे म्हणायचे काय, असे विचारतात. हीच गोष्ट आदिवासींना लागू पडते, आज जरी त्यांनी ख्रिस्ती वा हिंदू ईश्वर विधी, पद्धत वापरत असले तरी ते मुळात या दोघांपेक्षा प्राचीन आहे.

काळे व मळकर्णेकर यांच्या जातीचे लोकही रोट-विडीचे विधी करतात याचे कारण हे की गावडा हा आदिवासी सुमारे साडेसहा वर्षापूर्वी येथे आला- हळूहळू त्याने आपल्या वस्त्या तयार केल्या ज्याला पुढील काळात गावाचे स्वरूप आले. स्वत:ची देवदेवस्की सुरू झाली. नंतर जो नव्याने गावात आला की तोही जुन्याचा मान राखतो.

गोव्यतील प्रत्येक गावात ‘म्हारांगण’ आहे याचे कारण हे की ते आदिवासीच्या पूर्वीचे रहिवासी. पुढचे लोक आले ते अजून एक हजार वर्षाच्या फरकाने. गावात राहायचे असेल तर तेथल्या देवाला मान देणे आलेच. त्यामुळे या लोकांनाही आदिवासी विधीचा मान राखावा लागला. मागील बऱ्याच वर्षापासून बरेच जण भटजी वेळेत मिळत नाही म्हणून चतुर्थीला गणेशपूजा स्वत:च करीत आहे. पुढील काळात ‘भटजीविना चतुर्थी’ ही या घराण्याची प्रथा होणार आहे.

नेमके असेच आमच्या पूर्वजांच्या बाबतीत घडले असावे. मुळात आदिवासींचा देव वारुळरूपी ‘सांतेर’, ज्याला आज आपण देवी सातेरी म्हणतो. दुसऱ्यांनी जेव्हा आपापले देव आणले पण त्यांनी परवानगी घेऊन त्यांना तिच्या शेजारीच बसविले. या पुढेसुद्धा सातेरी, गावचे राखणदार यांचे ग्रामविधी आदिवासीकडूनच चालू राहिले.

काळे, मळकर्णेकर सांगतात त्यात तथ्य आहे, पण त्यांनी आदिवासीचे विधी करण्याचे कारण हे आहे की, काहीकडे आदिवासींच्या अनुपस्थितीमुळे किंवा त्यांच्या असहकारामुळे, गावावर देवाचा कोप नको म्हणून हे विधी इतरांनी स्वत: करणे सुरू केले असावे व ती प्रथा आजतागायत चालू आहे. या विषयी अधिक लिहिण्यासारखे खूप आहे पण ते पुढे कधीतरी.

थोडक्यात, जितके आम्ही इतिहासाच्या खोलात जाऊ तेवढे, तेव्हा आम्हांला कळेल की कधी काळी येथे गावड्यांच्या संरक्षणाखाली सर्वजण गुण्यागोविंदाने नांदत होते. या त्याकाळच्या रक्षणकर्त्या गावड्यांच्या समाधीला आज आम्ही ‘देवाचे झाड’ म्हणतो तर त्याच्या आत्म्याला ‘जाग्याचा राखणदार’. या राखणदाराला गोमंतकीय इतिहासाच्या क्रमिक पुस्तकात स्थान हवेच!

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News: धक्कादायक! अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी शिक्षकाविरुद्ध गुन्हा नोंद

Waste Management Projects: कुडचिरेवासियांच्या आंदोलनाला यश; प्रस्तावित बांधकाम कचरा निर्मूलन प्रक्रिया प्रकल्प होणार रद्द!

Goa Crime: दिवसाढवळ्या अपहरणाचा थरार! व्यवसायिकाला लुटण्याच्या मनसुब्यावर स्थानिकांनी फिरवले पाणी

Kala Academy: चूक मान्य करा, कामाला लागा!

Goa Accident: गोव्यात नऊ महिन्यात 209 अपघात, तरीही 10 टक्क्यांची घट; 'हे' आहे मुख्‍य कारणं

SCROLL FOR NEXT