पणजी कोरोना महामारीमुळे राज्यात लागू झालेल्या टाळेबंदीच्या काळात विविध ठिकाणी ठेवलेल्या कामगारांसाठी भाजीपाला राज्य सरकारच्या फलोत्पादन महामंडळाने पुरविला. त्यानंतर आता राज्यात कन्टेमेंट झोन निर्माण झाल्याने तेथील लोकांना घराबाहेर पडता येत नसल्यामुळे त्या ठिकाणी त्या त्या ठिकाणाच्या अधिकाऱ्यांच्या मागणीनुसार भाजीपाला आणि जीवनावश्यक वस्तूंचे किट महामंडळ पुरवित आहे. आत्तापर्यंत ८ हजार किट महामंडळाने पुरविल्याची माहिती महामंडळाचे चेअरमन तथा आमदार प्रवीण झांट्ये यांनी ‘गोमन्तक'ला दिली. राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढल्यामुळे आरोग्य खात्याने कंन्टेमेंट झोन तयार केले आहेत. कन्टेमेंट झोनमध्ये लोकांना बाहेर पडता येत नसल्याने त्या लोकांना आवश्यक वस्तूंचा पुरवठा करण्याची जबाबदारी महामंडळाला मिळाली आहे. त्यामुळे त्या त्या कन्टेमेंट झोनच्या अधिकाऱ्यांनी फलोत्पादन महामंडळाला नियमित लागणाऱ्या किट्सची मागणी करायची, तेवढे किट्स त्यांना पुरविले जातात. यामध्ये महामंडळ कांदा, बटाटा, मिरची, टोमॅटो, भेंडी असा भाजीपाला आणि तेल, मीठ, चहा पावडर, कपडे धुण्याचे-आंघोळीचे साबण, हळद, टूथपेस्ट, डाळी, साखर, रवा, पामतेल, आणि तांदुळ असा पुरवठा केला जात आहे. जशी मागणी येईल तसे किट्स तयार केले जात असल्याचे सांगून झांट्ये म्हणाले की, सध्या आम्ही जो काही माल घेत आहोत, तो क्रेडिटवर घेतोय. कारण सरकारी पैसे मिळण्यास बऱ्याच फाईली मंजूर व्हाव्या लागतात. परंतु सध्याची गरज ओळखून आम्ही क्रेडिटवर माल उचलला आहे. ते पुढे म्हणाले, कोरोनाचा फटका महामंडळालाही बसला आहे, कारण जे कामगार महामंडळात येतात ते कन्टेमेंट झोनमध्ये अडकले आहेत. त्यांना कामावर येता येत नाही, ही कामगारांची कमी आम्ही आता सध्या काणकोणहून पाडेलीची कामे करणारी मंडळी आणली आहे. वजन करायचे आणि साहित्य पिशवीत भरून पॅकिंग करावयाचे हे काम दिवसभर सुरू असते. आत्तापर्यंत आम्ही राज्यभरात ८ हजार किट्सचे वितरण केले आहे. या किट्सची किंमत त्यातील साहित्यानुसार ३५० ते ४०० रुपयांपर्यंत किंवा त्याच्यापुढेही जाते. स्थानिक शेतकऱ्यांच्या उत्पादनाला प्राधान्य! राज्य सरकारने २०३ मे. टन जीवनावश्यक वस्तूंची खरेदी केली आहे. टाळेबंदीचा विचार करून आम्ही स्थानिक शेतकऱ्यांकडील भाजापीला विकत घेतला आहे. महामंडळाने अडीच कोटी रुपयांचा ५४० मे. टन भाजीपाला खरेदी केला असून, ७५ लाख रुपयांची ४० मे. टन फळांचीही खरेदी केली आहे. त्यात कलिंगड, आंबा, केळी आणि अननस यांचा समावेश आहे. तसेच १८ लाख रुपयांचे २ लाख नारळ खरेदी करण्यात आले आहेत. स्थानिक शेतकऱ्यांना आम्ही या खरेदीच्या माध्यमातून त्यांना हक्काची बाजारपेठ मिळवून दिली आहे. मार्चमध्ये खरेदी केलेल्या भाजीपाल्यांची रक्कम शेतकऱ्यांना अदा करण्याचे काम सुरू झाल्याची माहिती चेअरमन झांट्ये यांनी दिली. |