पिसुर्ले: होंडा पंचायत प्रभाग ९ मधील भुईपाल येथील एका रस्त्याचे काम गेल्या २८ वर्षांपासून रखडले असून येथील नागरिकांना अजूनही कच्च्या रस्त्यावरून ये जा करावी लागते. दरम्यान, या कच्च्या रस्त्यावर असलेल्या साकव वजा पुलाला भगदाड पडल्याने येथून जाणाऱ्यांना धोका संभवतो.
दरम्यान, या कामाचा अहवाल आमदार डॉ. दिव्या राणे यांच्या सहकार्याने सार्वजनिक बांधकाम खात्याकडे पाठवला असून सरकारांकडून मंजुरी मिळाल्यानंतर काम सुरू होणार असल्याची माहिती पंच स्मिता मोटे यांनी दिली.
भुईपाल मुख्य रस्ता ते धनगरवाडा येथील धाकटू दवणे यांच्या घरापर्यंतचा कच्चा रस्ता साल १९९७ मध्ये पंचायतीने ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून उभारला होता. मात्र आजवर या रस्त्याचे डांबरीकरण झालेले नाही.
त्यामुळे येथील नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. या कच्च्या रस्त्यावरील दगड वर आलेले चालत किंवा वाहन घेऊन जाताना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो.
दरम्यान येथील साकव वजा पुलावरून पावसाळ्यात पाणी जात असल्याने जोड भागातील माती वाहून गेल्याने भगदाड पडले आहे. त्यामुळे हा रस्ता एकदम धोकादायक बनला आहे.
या रस्त्याचे डांबरीकरण करावे. अशी मागणी गेल्या कित्येक वर्षांपासून येथील नागरिक करीत आहेत. परंतु या मागणीकडे आजवर कोणीही लक्ष दिले नाही, त्यामुळे येथील लोक नाराजी व्यक्त करीत आहेत.
या रस्त्याची समस्या पंचायत निवडणुकीवेळी येथील नागरिकांनी आपल्यासमोर मांडली होती. त्यानुसार २०२२ मध्ये पंचायतीत ठराव घेऊन आमदार दिव्या राणे यांच्या सहकार्याने प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम खात्याकडे पाठवला आहे. वाळपई सार्वजनिक बांधकाम विभागाने हा रस्ता व पुलाच्या कामाबाबतचा खर्चाचा अहवाल मंजुरीसाठी सरकारकडे पाठवला आहे. मंजुरी मिळताच या कामाला सुरवात करण्यात येईल, असे पंच स्मिता मोटे यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.