Bhandari Samaj Election Process shri rudreshwar temple harvalem
पणजी: गोव्यातील बहुसंख्य असलेला हा भंडारी समाज संघटित होण्याचे सोडून चारी दिशांना तोंड करून आपलेच घोडे पुढे दामटण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत असल्याचे दिसून येत आहे.
भंडारी समाज सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. एकीकडे अशोक नाईक यांची समिती जिल्हा निबंधकांनी बेकायदेशीर ठरवून या गटाने घेतलेले निर्णय बाद ठरविले आहेत. असे असतानाही देवानंद नाईक गटाने पणजीतील समाजाच्या मुख्यालयातून तालुका समित्या जाहीर करण्याचा सपाटा लावला आहे.
दुसरीकडे विरोधी गटाने देवानंद नाईक गटाने जाहीर केलेल्या समित्या बेकायदेशीर असल्याचे सांगून देवानंद यांच्या समित्यांना मानणार नसल्याचे सांगत आपल्या परीने समित्यांचे गठण करण्याचा चंग बांधला आहे. तिसरीकडे विरोधी गटाच्या वकिलांनी जिल्हा निबंधकांकडे देवानंद नाईक गटाविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. चौथीकडे भंडारी समाजाचे आराध्य दैवत श्री रुद्रेश्वराची रथयात्रा संपूर्ण गोव्यात काढण्यासाठी बैठकांचे आयोजन केले आहे.
समाजातील आपापसातील मतभेद अद्याप मिटले नसताना आता अचानक नवनवीन विषय पुढे येत असल्याने समाजात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मये व साखळी हे बहुसंख्य भंडारी लोक असलेल्या मतदारसंघांत आजपर्यंत या समाजाला प्रतिनिधित्व करता आले नाही, ही शोकांतिका आहे. फोंडा आणि शिरोडा वगळता बाकी मतदारसंघांचे नेतृत्व या समाजाला कधी मिळाले नाही. धारबांदोडा, मुरगाव तालुक्यांतही भंडारी बहुतांश असून हीच स्थिती आहे. फोंड्यात तर स्वकीयच रवी नाईक यांना पराभूत करण्यासाठी टपले आहेत. या सर्व बाबींवर भंडारी समाजाने आत्मचिंतन करण्याची गरज निर्माण झाली आहे.
भंडारी समाजामध्ये सद्य:स्थितीत राजकीय पातळीवर अस्थिरता पाहायला मिळते. एकेकाळी विधानसभेत आठ-दहा आमदारांची संख्या असलेला हा समाज केवळ तीन-चार संख्येवर आला आहे. राज्याला याच समाजाचा मुख्यमंत्री लाभलेला, तसेच उपमुख्यमंत्री, गृहमंत्री, शिक्षणमंत्री, पंचायतमंत्री व अन्य महत्त्वपूर्ण खाती उपभोगलेला हा समाज आज राजकीय व्यासपीठावर नैराश्याच्या मार्गावर वाटचाल करीत आहे.
बार्देश, डिचोली, तिसवाडी, फोंडा, मुरगाव, धारबांदोडा या तालुक्यांत भंडारी बांधव बहुसंख्य असूनही येथे या समाजाच्या आमदारांची संख्या किती आहे, याचा विचार समाजाने करायला हवा. सध्या बार्देशातील शिवोली, साळगाव, कळंगुट, पर्वरी, थिवी व म्हापसा मतदारसंघात तसेच डिचोली व तिसवाडी तालुक्यात भंडारी आमदार निवडून येणे कठीण वाटते.
गोमंतक भंडारी समाज संस्थेतील वाद मिटत नसतानाच आता भंडारी समाजाचे आराध्य दैवत असलेल्या हरवळे येथील श्री रुद्रेश्वर देवस्थानचा रथ राज्यभर फिरवण्यात येणार आहे. समाज संस्थेच्या केंद्रीय समितीसाठी घेतलेली निवडणूक रद्द करावी, यासाठी आता जिल्हा संस्था निबंधकांकडे नव्याने अर्ज करण्यात आला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.