पणजी: गोमंतक भंडारी समाजात तब्बल तीन गट निर्माण झाले आहेत. या तिन्ही गटांनी एकमेकांवर दोषारोष करणे सुरू केल्याने तेढ वाढण्याची चिन्हे आहेत. गावकर यांच्या गटाने सरकारच्या भयाने समाजाची केंद्रीय समिती प्रश्न मांडत नसल्याचा आरोप केला आहे.
तर देवानंद यांनी हा आरोप फेटाळताना, सरकारच्या सहकार्याशिवाय समाजाचे काम पुढे नेणे शक्य नसल्याचे म्हटले आहे. तिसऱ्या गटाने माजी मंत्री दयानंद मांद्रेकर यांनी आवश्यकता भासल्यास समाजाच्या मागण्यांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत निवेदन पोचवण्याची तयारी केली आहे.
भंडारी समाजाची जनगणना व्हावी, याविषयी तिन्ही गटांचे मतैक्य आहे. मात्र, ते या मुद्यावर एकत्र येत नाहीत, हेही सत्य आहे. यापैकी दोन गट मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना भेटले. माजी मंत्री आणि आमदारांचा समावेश असलेल्या गटाच्या या भेटीसाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी पुढाकार घेतला होता.
देवानंद यांचा गट काल रात्री उशिरा स्वतंत्रपणे मुख्यमंत्र्यांना भेटला. गावकर सध्या राज्याबाहेर आहेत. त्यांना या घडामोडींविषयी विचारले असता ते म्हणाले, समाजाच्या हितासाठी जे काही निर्णय घ्यायचे असतील ते घेतले जातील. आमच्याकडे सर्व तालुक्यांमधील नेत्यांचे प्रतिनिधित्व आहे. देवानंद यांच्या समितीत निवडून आलेले चारजण आमच्यासोबत आहेत, यावरून काय ते समजा.
देवानंद यांनी, मागण्यांसाठी अखेर सरकारकडेच जावे लागते. यासाठी मुख्यमंत्र्यांना भेटल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले, समाजाच्या मे मध्ये होणाऱ्या आमसभेत याविषयी निर्णय घेतला जाणार आहे. तोवर ओबीसींमधील इतर १८ समाजांच्या नेत्यांशी संवाद साधला जाईल. माजी मंत्री आणि आमदारांना सोबत घेण्याची भूमिका गावकर यांनी घेतली आहे, तर देवानंद यांनी ते राजकीय कारणास्तव सक्रिय झाले आहेत, अशी टीका केली आहे.
भंडारी समाजातील नेत्यांनी समंजसपणा दाखवण्याची गरज आहे. चर्चा करून यातून मार्ग काढला जाऊ शकतो. वादाने समाजाचे हित साधले जाणार नाही.- श्रीपाद नाईक, केंद्रीय राज्यमंत्री.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.