पणजी: राज्यात गेल्या दोन-तीन दिवसांपासून वातावरणात अचानक मोठा बदल झाला असून उन्हाची तीव्रता प्रचंड वाढली आहे. फेब्रुवारी महिना संपता संपता उन्हाळ्याची चाहूल लागण्याऐवजी थेट 'हिटवेव्ह'सारखी परिस्थिती जाणवू लागली आहे. वाढत्या उष्म्यामुळे नागरिक हैराण झाले असून दुपारी रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळत आहे. गोवा वेधशाळेने दिलेल्या ताज्या माहितीनुसार, आगामी ४८ तासांत तापमानात आणखी वाढ होण्याची दाट शक्यता आहे.
राज्याच्या कमाल तापमानाची नोंद ३४ अंश सेल्सिअस इतकी करण्यात आली, तर किमान तापमान २३.४ अंश सेल्सिअस राहिले. विशेष म्हणजे, यंदाचे कमाल तापमान हे सरासरीच्या तुलनेत तब्बल १.६ अंशांनी अधिक नोंदवले गेले आहे. वेधशाळेच्या अंदाजानुसार, येत्या दोन दिवसांत हा पारा ३५ अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा जास्त जाण्याची चिन्हे आहेत. अचानक वाढलेल्या या उष्णतेमुळे आर्द्रतेचे प्रमाणही बदलत असून नागरिकांना घामाच्या धारांचा सामना करावा लागत आहे.
सध्या राज्यातील हवामानाचे स्वरूप दुहेरी झाले आहे. दुपारी कडक ऊन आणि रात्रीच्या वेळी जाणवणारा गारवा यामुळे आरोग्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. अशा 'डबल सीझन'मुळे सर्दी, खोकला आणि तापासारख्या आजारांचे प्रमाण वाढत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊ नये म्हणून जास्तीत जास्त द्रव पदार्थांचे सेवन करावे, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिला जात आहे.
वाढत्या उष्म्याचा फटका लहान मुले आणि ज्येष्ठांना बसण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे दुपारी १२ ते ३ या वेळेत अत्यंत आवश्यक काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन गोवा वेधशाळेने केले आहे. बाहेर पडताना टोपी, रुमाल किंवा छत्रीचा वापर करावा आणि सुती कपड्यांना प्राधान्य द्यावे. हवामानातील हा बदल केवळ तात्पुरता नसून उन्हाळ्याची तीव्र सुरुवात असल्याचे संकेत मिळत आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.