CM Pramod Sawant यंदा पाऊस लांबल्याने पाणी साठवणुकीची नितांत गरज आहे. त्यामुळे यापुढे पाणी साठविण्यास मदत करणाऱ्या बंधाऱ्यांच्या उभारणीला होणारा विरोध खपवून घेणार नाही, असा सज्जड इशारा आज मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिला.
मळा-पणजी येथे आज ‘स्मार्ट सिटी मिशन’अंतर्गत १५ कोटींच्या ‘फ्लड वॉटर पंपिंग स्टेशन’चे लोकार्पण करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. याप्रसंगी केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, जलस्रोत मंत्री सुभाष शिरोडकर, महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात, महापौर रोहित मोन्सेरात उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले की, स्थानिकांच्या विरोधामुळे कुर्टी येथील बंधारा पूर्ण होऊ शकला नाही. पाण्याची गरज वाढत आहे. यासाठी तातडीने कुर्टीसह आणखी चार बंधाऱ्यांचे काम हाती घेण्यात येणार आहे.
आज उदघाटन केलेल्या प्रणालीमध्ये ५ पंपांसह पूर पाणी पंपिंग स्टेशनचा समावेश आहे. पाणी पातळी राखण्यासाठी आणि पूर टाळण्यासाठी मळा सरोवरातून खाडीपर्यंत पाणी उपसा केला जाईल.
पुराचा धोका टळला!
या प्रकल्पांतर्गत पावसाच्या पाण्याचे सर्व ड्रेनेज मळा तलावाला जोडले आहेत. तसेच भरतीवेळी पाण्याचा प्रवेश नियंत्रित करण्यासाठी स्वयंचलित गेट लावले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून या भागातील स्थानिकांना पावसाळ्यात पुराचे पाणी घरांमध्ये शिरल्याने त्रास सहन करावा लागत होता. आता ही समस्या कमी होईल, असे सांगण्यात आले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.