पणजी: गोवा हे पर्यटनप्रेमी राज्य आहे. दरवर्षी मोठ्यासंख्येने पर्यटक गोव्यात येतात. याच पार्श्वभूमीवर गोव्याचे पर्यटन धोरण आणि आगामी हंगामासाठी आवश्यक उपाययोजनांवर मंगळवारी (13 मे) पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. पंचतारांकित आणि चार तारांकित हॉटेल्सच्या प्रतिनिधींसह, क्षेत्रातील भागधारक, पर्यटन संचालक केदार नाईक आणि टीटीएजी अध्यक्ष जॅक सुखिजा यांची या बैठकीत उपस्थिती होती. विविध उपविभागातील चर्चांमध्ये सध्याच्या समस्यांपासून ते भविष्यातील धोरणांपर्यंत अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली.
पर्यटनमंत्री रोहन खंवटे (Rohan Khaunte) यांनी सांगितले की, शॅक चालक, होमस्टे चालक, वॉटर स्पोर्ट्स व्यावसायिक यांच्यासोबत बैठक घेतली आणि त्यांच्या समस्या व नवीन योजना यावर चर्चा केली. यामध्ये बेकायदेशीर दलाल, टॅक्सी सेवा आणि भटक्या कुत्र्यांची समस्या यावरही चर्चा झाली. या सर्व मुद्यांवर लवकरच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासोबत याच आठवड्यात सविस्तर चर्चा होणार आहे.
जम्मू-काश्मीरमधील (Jammu and Kashmir) पहलगाम हल्ल्याचा परिणाम पर्यटकांच्या नियोजनावर होणार असल्याचे मंत्री खंवटे यांनी मान्य केले. युद्धाच्या पार्श्वभूमीवर कोणी कुणासाठी थांबत नाही. सर्वांनी आपला व्यवसाय सुरु ठेवावा लागतो, असेही मंत्री खवंटे म्हणाले. मात्र येत्या पर्यटन हंगामात पोलंड, उझबेकिस्तान आणि रशिया येथून पर्यटक येणार असून रशियन पर्यटकांची संख्या दुप्पट होण्याची अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली.
मे महिन्यानंतर पावसाळी कालावधीत पर्यटनाला चालना देण्यासाठी विशेष योजना आखण्यात येणार असल्याचेही मंत्री रोहन खंवटे यांनी सांगितले. ते म्हणाले की, स्थानिकांना रोजगार उपलब्ध होईल अशा उपक्रमांवर भर दिला जाणार आहे. प्रत्येक गोमंतकीय हा गोव्याचा प्रभावक आहे, असे सांगून त्यांनी स्थानिकांनी पर्यटन व्यवस्थेत सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले.
गेस्ट हाऊस आणि विला मालकांसाठी नोंदणी व परवाना धोरण ठरवले जाणार आहे. चांगल्या व्यवसायासाठी पारदर्शकता आणि कायदेशीरता या गोष्टी आवश्यक असल्याचे मंत्री खंवटे यांनी अधोरेखित केले.
गोव्यातील वॉटर स्पोर्ट्स व्यवसाय गोमंतकीयांच्या हाती राहणार यावर सरकार ठाम आहे, असे स्पष्ट करत मंत्र्यांनी बेकायदेशीर दलालांमुळे होणाऱ्या नुकसानीकडे लक्ष वेधले. नवतंत्रज्ञानाचा वापर करून हा व्यवसाय अधिक सुरक्षित, कायदेशीर आणि पारदर्शक व्हावा यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे देखील त्यांनी नमूद केले.
पर्यटन क्षेत्रातील सर्व भागधारकांबरोबर समन्वय ठेवून, शाश्वत पर्यटन, स्थानिकांचा सहभाग आणि स्वच्छता या बाबींवर विशेष भर दिला जाणार आहे. सध्या स्पर्धा वाढली आहे, त्यामुळे आपल्याला आधुनिक तंत्रज्ञान आणि उत्तरदायित्व यांचा स्वीकार करावा लागेल, असे सांगत मंत्री खंवटे यांनी गोवा पर्यटनाच्या पुढील प्रवासाचे संकेत दिले.
मंत्री खंवटे यांनी स्पष्ट केले की, विमान तिकिट किंमत आणि हॉटेल खोल्यांचे दर वाढल्यामुळे पर्यटक पर्याय म्हणून इतर राज्यांकडे वळत आहेत. गोव्याची संस्कृती आणि पर्यटन एकमेकांपासून वेगळी करता येणार नाही, असे त्यांनी ठामपणे नमूद केले. पर्यटकांचा अनुभव दर्जेदार असणे आवश्यक असून त्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.