सासष्टी: गोव्यात एप्रिलमध्ये शालेय वर्ष सुरू करण्याचा प्रश्न दक्षिण गोव्याचे खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यापर्यंत पोहोचविला. फर्नांडिस यांनी काल केंद्रीय शिक्षण मंत्र्यांची भेट घेऊन या संदर्भात त्यांना पाच पानांचे निवेदन सादर केले व या निर्णयावर पुनर्विचार करावा, अशी मागणी केली.
खासदार फर्नांडिस यांनी नंतर सांगितले की, नवी दिल्लीत एप्रिलमध्ये शालेय वर्ष सुरू होते व जून-जुलै महिन्यात शाळांना सुट्टी असते. कारण त्यावेळी दिल्लीत उन्हाळा असतो. गोव्याची स्थिती तशी नाही. एप्रिल व मे हे दोन महिने अति गरमीचे असतात. गोव्यात एप्रिल-मे महिन्यांत शाळांना सुटी देऊन जूनमध्ये शाळा सुरू करण्याची प्रथा दशकानदशके सुरू आहे. हे मुद्दे आपण केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या नजरेस आणून दिले आहेत, असेही फर्नांडिस यांनी सांगितले. गोव्यात ७ एप्रिलपासून शालेय वर्ष सुरू होत असून १ मे ते ३ जूनपर्यंत शाळांना सुटी जाहीर करण्यात आली आहे.
७ एप्रिलपासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू करण्याच्या सरकारच्या अधिसूचनेला आव्हान देण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून या आठवड्यात ही याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात सादर केली जाणार असल्याचे मत काही पालकांनी व्यक्त केले.
या नव्या शैक्षणिक वर्षानुसार एप्रिलमध्ये घेण्यात येणारे वर्ग हे सकाळी ११.३० वा.नंतर सोडण्यात येणार आहेत. अनेक मुलांना पालक सकाळी शाळेत सोडून दुपारी नेण्यास येतात.
मात्र, शाळा सुटण्याची वेळ ११.३० वा.ची असल्याने पालकांना आपले काम सोडून त्यांना शाळेतून आणण्यासाठी यावे लागणार आहे. या सर्वांचा विचार सरकारने न करताच हा निर्णय घेतलेला आहे. भर उन्हात हे वर्ग एप्रिलमध्ये सुरू ठेवणे विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या हिताच्या दृष्टीने हानिकारक आहे, असे मत पालकांनी व्यक्त केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.