मडगाव: ‘कॅश फॉर जाॅब’ घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर गोव्यातील युवकांसाठी आशेचा किरण जर कोणता असेल तर तो पुढील संपूर्ण नोकरभरती ‘कर्मचारी निवड आयोगा’तर्फे केली जाण्याची सरकारने केलेली घाेषणा. या आयोगामार्फत होणारी नोकरभरती गोव्याच्या युवकांना आशेचा किरण दाखविणारी असे म्हणावे लागेल.
वास्तविक गोव्यात हा आयोग पाच वर्षांपूर्वीच स्थापन केला गेला. मात्र, मागच्या पाच वर्षांत या आयाेगाला स्थिरस्थावर होण्यासाठी वेळ लागला असे म्हणावे लागेल. आता वर्षभरापूर्वी या आयोगाने आपले काम सुरू केले असून या आयोगामार्फत केल्या गेलेल्या भरती प्रक्रियेतून सुमारे ५० ते ६० जणांना नोकऱ्याही प्राप्त झाल्या आहेत.
सध्या गोव्यात ‘कॅश फॉर जाॅब’ घोटाळा गाजत असून प्रत्येक दिवशी जादूगारच्या टोपीतून एक नवीन चीज बाहेर यावी तसे एक-एक नवीन प्रकरण पुढे येऊ लागले आहे. गोव्यातील या नोकरभरती घोटाळ्यातील रकमेने ५० कोटींचा टप्पा कधीचाच पार केला असून आता या घोटाळ्याची व्याप्ती शंभर कोटींकडे पोहोचली आहे.
यामुळे गोव्याचे नाव खराब तर झालेले आहेच. मात्र, त्याहीपेक्षा जर हवालदिल कोण झाला असेल तर तो गोव्याचा युवक. आमच्या नोकऱ्या भलतेच काेणीतरी घेऊन जात आहेत, अशातऱ्हेची भावना त्यांच्या मनात निर्माण होऊ लागली आहे. त्यामुळे हा युवक निराशही झालेला दिसून येतो.
वशिल्याशिवाय सरकारी नोकरी लागू शकत नाही. अशी नोकरी लावून घेण्यासाठी काही राजकारण्यांना पैसे द्यावे लागतात. फक्त आताच नव्हे तर काँग्रेस सरकारच्या काळातही सरकारी नोकरभरती ही बहुतांश अशाचप्रकारे केली जायची. त्यामुळे यावर उपाय म्हणून दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी २०१२ साली असा नोकरभरती आयोग सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. यापूर्वी जी नोकर भरती खातेनिहाय पद्धतीने केली जायची ती तशी न करता या आयाेगामार्फत करण्याचा प्रस्ताव त्यांनी ठेवला होता. जेणेकरून या नोकरभरतीत एक प्रकारची सुसूत्रता येणे शक्य होणार होते.
मात्र, आयोगामार्फत नोकरभरती म्हणजे, मंत्र्यांचे महत्त्व कमी होणार अशी भावना त्यावेळच्या मंत्र्यांमध्ये तयार झाल्याने त्यांनी पर्रीकरांवर दबाव आणून हा असा आयोग स्थापन करण्यास आडकाठी आणली. मात्र, प्रमाेद सावंत यांनी मुख्यमंत्रिपदाचा ताबा घेतल्यानंतर फेब्रुवारी २०१९ मध्ये हा आयोग स्थापन केला. मात्र, आयोगाला स्थिरस्थावर होण्यासाठी वेळ गेल्याने नोकरभरती ही मागच्या वर्षांपर्यत खात्यामार्फतच केली जात असे.
संपूर्ण सरकारी नोकरभरती आयोगामार्फत करण्याची घाेषणा मुख्यमंत्री प्रमाेद सावंत यांनी आता केल्यानंतर या घोषणेचे सर्वांत जास्त स्वागत केले असेल तर ते गोव्यातील युवा पिढीने. वेगवेगळ्या क्षेत्रात सक्रिय असलेल्या कित्येक युवकांशी ‘गोमन्तक’ने संपर्क साधला असता, बहुतेक सर्वच युवकांनी हा निर्णय एकदम चांगला असून यामुळे पारदर्शकरीत्या नाेकरीभरती प्रक्रिया पूर्ण होऊ शकेल, अशातऱ्हेच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
गोवा कर्मचारी भरती आयोगाच्या अध्यक्षपदी गोव्याच्या मुख्य सचिवांची नियुक्ती केली असून निवृत्त आयएएस अधिकारी असलेले दौलत हवालदार आणि मिनीन डिसोझा हे या आयोगाचे अन्य दोन सदस्य आहेत.
आयोगाच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे, या आयोगामार्फत जी नोकरभरती प्रक्रिया केली जाते ती पूर्णत: संगणकीय पद्धतीची असल्याने त्यात मानवी हस्तक्षेपाला कुठलाही वाव नसतो. त्याशिवाय जे उमेदवार परीक्षा देतात ती डिजिटल पद्धतीने असल्याने आपण दिलेल्या परीक्षेत आपल्याला किती गुण मिळाले हे त्यांना लगेच कळू शकते.
एका सदस्याने दिलेल्या माहितीप्रमाणे, ‘बिट्स’ ही संस्था देशात आपल्या स्पर्धांत्मक परीक्षा ज्या पद्धतीने घेते त्याच पद्धतीने गोव्यातील नोकर भरती आयाेगाच्या परीक्षा घेतल्या जातात. ज्या दिवशी परीक्षा दिली जाते त्याच दिवशी त्या उमेदवाराला त्याला किती गुण मिळाले हे समजते. या परीक्षेत बसलेल्या इतर विद्यार्थ्यांनाही किती गुण मिळाले, याची माहिती परीक्षा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आयाेगाच्या वेबसाईटवर अपलाेड केली जात असल्यामुळे इतरांनाही किती गुण मिळाले ते समजू शकते.
ही नाेकरभरती प्रक्रिया अशी पारदर्शक असल्याने कुणावरही अन्याय होऊ शकत नाही. काहीजणांना त्यात काही त्रुटी आढळून आल्यास त्याही दूर करण्यासाठी त्यांना वाव असतो. त्यामुळे आयोगातर्फे केली जाणारी नोकरभरती प्रक्रिया शंभर टक्के पारदर्शक असते, अशी माहिती या आयोगाच्या एका सदस्याने दिली.
अशा पद्धतीने नोकरभरती केल्यास योग्य आणि पात्र उमेदवारालाच नोकरी मिळू शकेल. जेणेकरून पात्र उमेदवार सरकारी नाेकर म्हणून नोकरीत येऊ शकतील आणि चांगले पात्र उमेदवार नोकरीत आल्यामुळे नागरिकांना जी सेवा मिळते तीही चांगल्याप्रकारची मिळू शकेल, अशा प्रतिक्रिया कित्येक युवकांनी व्यक्त केल्या.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.