पणजी: राज्यात यंदा ५ जून रोजी मान्सून दाखल झाल्यापासून आत्तापर्यंत एकदाही अतिवृष्टीची स्थिती निर्माण झालेली नाही किंवा ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आलेला नाही. त्यामुळे यंदाचा पावसाळा प्रथमच ‘रेड अलर्ट’विनाच जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सर्वसाधारणपणे दर पावसाळ्यात किमान तीन ते चार वेळा गोवा वेधशाळेला ‘रेड अलर्ट’ जारी करावा लागतो. मात्र, यंदा पावसाची तीव्रता कमी राहिल्याने अशी स्थिती निर्माण झालेली नाही. ‘रेड अलर्ट’ जारी झाला नसला तरी राज्यात आत्तापर्यंत चार वेळा ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.
गेल्या पाच वर्षांतील पावसाचा आढावा घेतल्यास एकाच दिवसात सहा इंच किंवा त्याहून अधिक पावसाची नोंद अनेकदा झाली आहे. यंदा मात्र एका दिवसातील सर्वाधिक पाऊस ३.५२ इंच इतकाच नोंदविला गेला आहे.
आत्तापर्यंत राज्यात सरासरी १०५ इंच पाऊस अपेक्षित असताना केवळ ७५ इंच पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यात पावसाचा तब्बल २९ टक्के तुटवडा आहे.
दरम्यान, वाळपईनंतर आता धारबांदोड्यातही १०० इंच पावसाची नोंद झाली आहे. राज्यात सर्वांत कमी पाऊस पणजीत ४७ इंच एवढा झाला आहे.
यंदाचे ‘ऑरेंज अलर्ट’
२५ जून १ दिवस
३० जून १ दिवस
४ आणि ५ जुलै २ दिवस
२६ आणि २७ जुलै २ दिवस
यंदा जेवढ्या प्रमाणात कमी दाबाचा पट्टा निर्माण होणे अपेक्षित होते, तेवढा तो झाला नाही. एल निनोचा प्रभावही काही प्रमाणात जाणवला. सद्य:स्थितीत देशात ४० टक्के तर राज्यात २९ टक्के पावसाचा तुटवडा आहे.
- एम. आर. रमेशकुमार , शास्त्रज्ञ (निवृत्त) एन.आय.ओ.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.