पणजी: राज्यात मान्सूनच्या पावसाने २१ जूनपासून हजेरी लावलेली असली, तरीही पावसात अजूनही सरासरी ४४.०९ टक्क्यांची तूट आहे. राज्य हवामान विभागाच्या अंदाजानुसार काही भागांत मुसळधार, तर काही ठिकाणी मध्यम ते हलक्या स्वरुपाचा पाऊस पडला. विभागाने पुढील आठवडाभर पावसाचा यलो अलर्ट जारी केल्याने पावसाची सरासरीतील तूट लवकरच भरून येण्याची शक्यता आहे.
मान्सून हंगामातील १ ते २८ जून या कालावधीत राज्यात सरासरी ३२.७९ इंच पावसाची नोंद होते. गतवर्षी या काळात २८.६६ इंच इतका पाऊस पडलेला होता. परंतु, यंदा ५ जून रोजी राज्यात दाखल होऊनही मान्सूनने २१ जूनपर्यंत राज्याकडे पाठ फिरवली.
त्यानंतर त्याने सातत्याने हजेरी लावली. त्यामुळे १ ते २७ जून या काळातील पावसाची नोंद १८.०५ इंच इतकी झालेली आहे. २१ जूनआधी सरासरी पावसातील तूट ७१ टक्क्यांवर गेलेली होती. परंतु, गेल्या आठवड्यात पडत असलेल्या पावसामुळे ही तूट सुमारे २६ टक्क्यांनी भरून निघाली आहे.
हवामान विभागाने रविवारी सकाळी पुढील आठ दिवसांसाठी यलो अलर्ट जारी केला होता. पण, नंतर दुपारनंतरच्या काळासाठी ऑरेंज अलर्ट दिला.. पुढील सात दिवसांसाठी यलो अलर्ट कायम ठेवल्याने पावसात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. १ ते २७ जून या कालावधीत सर्वाधिक पावसाची नोंद काणकोण (३५.३२ इंच) येथे झाली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.