पणजी: सांत आंद्रेचे आमदार वीरेश बोरकर यांनी नगरनियोजन कायद्यातील ‘कलम ३९ अ’ रद्द करण्यासाठी लढा देण्याचा आपला निर्धार कायम ठेवला आहे. आंदोलन करण्यासाठी घराबाहेर पडलेले बोरकर आठ दिवसांनंतर घरी परतले.
आझाद मैदानावर सहा दिवस बेमुदत उपोषण केल्यानंतर सहाव्या दिवशीच्या रात्री त्यांनी उपोषण मागे घेतले. त्यानंतर प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते खासगी इस्पितळात दाखल झाले होते. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी त्यांची इस्पितळात जाऊन विचारपूस केली होती. त्यांना इस्पितळातून घरी पाठवण्यात आले.
रुग्णालयातून बाहेर पडल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना अत्यंत आक्रमक भूमिका घेतली. प्रकृती अस्वास्थ्यामुळे काही काळ सक्रिय राजकारणापासून दूर राहावे लागल्याने विरोधकांना आपण खचलो आहोत, असे वाटले असेल, मात्र आता पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरणार असून `३९-अ' या वादग्रस्त कलमाविरोधातील लढा पुन्हा नव्या जोमाने सुरू करणार, असे त्यांनी स्पष्ट केले.
त्यांनी सांगितले, की आमच्या पूर्वजांनी राखून ठेवलेल्या जमिनींचे रक्षण करणे हे आमचे सर्वोच्च कर्तव्य आहे. मात्र त्याविरोधात सरकारचे वागणे आहे. भू रूपांतराला सरसकट परवानगी देत गोवा नष्ट केला जात आहे. या माध्यमातून स्थानिकांना त्यांच्या मालमत्तेतून हुसकावून लावले जात आहे. यामुळे गोव्याचे अस्तित्वच धोक्यात आले आहे.
प्रकृती ठीक नसल्याने गेल्या काही दिवसांपासून मी या लढ्यात प्रत्यक्षात उपस्थित राहू शकलो नव्हतो, तरीही त्यांचे कार्यकर्ते आणि गोवेकर हा लढा नेटाने पुढे नेत होते. आता प्रकृती स्थिर असून पुन्हा एकदा रस्त्यावर उतरून अन्यायाचा जाब विचारणार आहे.
नगरनियोजन कायदा कलम ‘३९-अ’ रद्द करण्याच्या मागणीसाठी मंत्री विश्वजीत राणे यांच्या निवासस्थानी मोर्चा नेणाऱ्या आंदोलकांमधील गजानन तिळवे, योगेश गोवेकर आणि फ्रान्सिस कुएल्हो या तिघांना पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले होते. मात्र, हजारो लोकांच्या आंदोलनातील केवळ तिघांवरच ‘एफआयआर’ का? सरकार आणि पोलिस नेमके कोणाच्या दबावाखाली आहे? असा सवाल ॲड. अमित पालेकर यांनी उपस्थित केला. या प्रकरणाची उच्च न्यायालयाने स्वेच्छा दखल घ्यावी, यासाठी न्यायालयात अर्ज करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
चेकपोस्टवर तिन्ही आंदोलकांच्या समर्थनासाठी पालेकर उपस्थित होते. आंदोलक आधी नगरनियोजन विभाग कार्यालयात बसले होते. तिथून बाहेर काढल्यावर ते मंत्र्यांच्या घरी गेले. मग केवळ या तिघांनाच समन्स का? आंदोलनात सहभागी असलेल्या प्रत्येक व्यक्तीला समन्स बजावा, मग कोणाची किती ताकद आहे, ते दिसेल, असेही पालेकर म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.