पणजी: यंदा देशातील इतर भागांत आंब्याचे पीक घटले असले तरी गोव्यात मोठ्या प्रमाणात आंब्याचे उत्पादन वाढले असून आता बाजारात मोठ्या प्रमाणात मानकुराद आंब्याची आवक वाढली आहे. उत्तम गुणवत्तेचा मानकुराद आंबा आता अवघा ५०० रुपये डझन दराने विकला जात असून मध्यम आणि लहान आकाराचे मानकुराद ४०० आणि ३०० रुपये प्रतिडझन दराने विकले जात असल्याने खवय्यांसाठी ही पर्वणीच ठरली आहे.
राज्यात जरी मानकुराद आंब्याचे भाव गडगडले असले तरी लिंबू मात्र भाव खात असून पणजी बाजारात ८ रुपयांना मध्यम आकाराचा एक लिंबू विकला जात आहे. ५० आणि १०० रुपयांच्या वाट्याने लिंबू विकले जात असून त्यात लहान आणि मध्यम आकाराचे दहा ते बारा लिंबू असतात. वाढत्या उष्म्यात गारवा मिळावा, रोगप्रतिकारकशक्ती तसेच उष्माघाताचा त्रास होऊ नये, यासाठी प्रामुख्याने लिंबूसेवन केले जाते. दरात वाढ झाली असली तरी लिंबू अधिक भाव खात आहे.
गेल्या वर्षी आंब्यांची आवक घटल्याने मे महिन्यात हजार रुपयांहून अधिक दराने मानकुराद आंबा विकला जात होता. परंतु यंदा ऐन मेच्या सुरुवातीलाच ४०० रुपये डझन दराने आंबा विकला जात आहे. आंब्याची आवक बाजारात मोठ्या प्रमाणात वाढल्याने दरात घट झाली आहे. आवक वाढण्याचे प्रमुख कारण म्हणजे वाढत्या उष्णतेमुळे आंबा लवकर परिपक्व होत असून लवकर पिकतही आहे. त्यामुळे यंदा आंब्याचे दर गडगडले आहेत. याचा काही प्रमाणात फटका शेतकऱ्यांना बसत असला, तरी आंबाप्रेमींसाठी ही पर्वणीच आहे.
शहरी भागात करवंद, जांभूळ, फणस तसेच इतर ऋतुजन्य फळे मिळणे कठीण होते. त्यामुळे अनेक शहरांतील नागरिक हा रानमेवा ग्रामीण भागातून बाजारात विक्रीसाठी घेऊन येणाऱ्या महिलांकडून खरेदी करतात. जांभूळ हे मधुमेहाच्या रुग्णांसाठी लाभदायक असल्याने इतर रानमेव्याच्या तुलनेत त्याची खरेदी अधिक होते. शहरी भागातील ग्राहकांकडून रानमेव्याला चांगली मागणी असल्याचे विक्रेते सांगतात.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.