The unity of the minorities was important in the victory of South Goa candidate viriato fernandes
The unity of the minorities was important in the victory of South Goa candidate viriato fernandes Dainik Gomantak
गोवा

Goa Loksabha Election Result: दक्षिण गोव्यात अल्पसंख्याकांची एकजूट ठरली महत्त्वाची; सासष्टीचा गड सर

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Loksabha Election Result: ज्या मतदारसंघावर साऱ्यांच्या नजरा खिळून होत्या, तो दक्षिण गोवा मतदारसंघ अखेर काँग्रेसने आपल्या कह्यात घेतला. काँग्रेसचे विरियातो फर्नांडिस यांनी १,४७०३ मतांनी विजय प्राप्त केला. म्हणजे गेल्या वेळेपेक्षा काँग्रेसला यावेळी जवळपास ५ हजार मतांची आघाडी मिळाली.

गेल्या वेळेला सुदिन, रवी, दिगंबर, बाबू कवळेकर यांसारखे रथी-महारथी भाजपसोबत नसतानाही कॉंग्रेसचा फक्त ९ हजार मतांनीच विजय झाला होता. म्हणूनच यावेळच्या कॉंग्रेसच्या विजयाचे महत्त्व अधोरेखित होते. यातून मतदारांनी भाजपला दोन संदेश दिले आहेत.

एक म्हणजे मतदारांना गृहीत धरू नका आणि दुसरा म्हणजे आमदारांना आयात केले म्हणून कार्यकर्ते आयात होत नसतात. खरे तर यावेळी भाजपने दक्षिण गोवा मतदारसंघ प्रतिष्ठेचा बनविला होता. दिगंबर कामत, रवी नाईक, आलेक्स सिक्वेरा, संकल्प आमोणकर यांसारखे कॉंग्रेस नेते भाजपमध्ये आल्यामुळे दक्षिण गोवा काबीज करणे सोपे होईल, असे भाजपला वाटत होते. त्यात परत आलेक्स सिक्वेरांना मंत्री करून सासष्टीतल्या अल्पसंख्याकांनाही चुचकारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. पण या सर्व प्रयत्नांवर पाणी पडले.

बाणावली, वेळ्ळी, नुवे यासारख्या मतदारसंघांत तुलनेने कमी मतदान होऊनही कॉंग्रेसने बाजी मारलीच. खरे तर यावेळी कॉंग्रेस विशेष संघटित वाटत नव्हती. काही मतदारसंघांत तर बुथवर बसायलासुध्दा कार्यकर्ते नव्हते. त्यात परत उमेदवारी उशिरा जाहीर झाल्यामुळे उमेदवारांना प्रचार करायला वेळ नव्हता. पण जनताच कॉंग्रेसच्या मदतीला धावून आली. सायलेंट व्होटर्स म्हणजे काय चीज असते, याचा प्रत्यय यावेळी आला. खरे तर दक्षिणेतील अनेक मतदारसंघांत फिरताना याचा प्रत्यय येत होता.

वास्तविक मुख्यमंत्र्यांनी यावेळी कोणतीच कसर बाकी ठेवली नव्हती. पंतप्रधान नरेंद्र मोदींची सांकवाळ येथे सभा ठेवण्यापासून ते मतदारसंघातील विविध भागांना भेटी देण्यापर्यंत सर्व ‘हातखंडे’ मुख्यमंत्र्यांनी वापरले; पण शेवटी ‘ये जो पब्लिक है, ये सब जानती है’ हेच खरे. सत्ताधाऱ्यांच्या विरोधात जी सायलेंट आग धुमसत होती; तिचा परिणाम या निवडणुकीत दिसून आला. त्यामुळे आयात केलेल्या आमदारांचा अजिबात प्रभाव पडला नाही.

आता या पराभवाचे अनेक अन्वयार्थ लावण्यात येतील. गेली पाच वर्षे मतदारांशी ‘कनेक्ट’ असलेल्या सावईकरांसारख्या माजी खासदारांना डावलून पल्लवींना पटलावर आणण्यात नेमकी कोणती रणनीती होती आणि ती का फसली, याचाही आढावा घ्यावा लागेल.

विश्‍वजीत राणे यांचे भरीव योगदान

उत्तरेत श्रीपाद नाईकांचा विजय हा तसा अपेक्षितच होता. त्यात सत्तरीचे बाबा तथा आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे त्यांच्या मदतीला आल्यामुळे दुधात साखर पडल्यासारखे झाले. सत्तरीतल्या पर्ये व वाळपई या मतदारसंघांतून भाजपला जी ३३ हजारांहून अधिक मतांची आघाडी मिळाली, त्यातून हेच सूचित होते. त्यामुळे आता भाजपच्या गोटात विश्‍वजीत यांचे वजन वाढणार, यात शंकाच नाही. एकंदरीत दक्षिणेतील पराभव हा भाजपसाठी अधिकच बोचरा ठरला. त्याचे पडसाद येणाऱ्या भविष्यात उमटण्याची शक्यता असून काहींना बळीचा बकराही बनविले जाऊ शकतो.

काही नेते हिरमुसले

दक्षिणेतील अनेक विधानसभा मतदारसंघांत भाजपने विजयोत्सवाची तयारी सुरू केली होती. शिरोड्याचे आमदार तथा जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांनी तर आपल्या कार्यकर्त्यांना तसा आदेशही दिला होता. पण शेवटी ‘शीतापुढे मीठ’ खाण्याचा प्रकार ठरला. श्रीपाद नाईक विजयी होऊनही पल्लवींच्या पराभवामुळे अनेक भाजप नेते हिरमुसल्याचे स्पष्टपणे दिसत होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Filmcity: गोवा फिल्मसिटीच्या कामासाठी सरकारी हालचाली सुरु, वाद पुन्हा उफाळण्याची शक्यता

Goa Monsoon 2024: गोव्यात चार दिवस यलो अलर्ट; कोणत्या धरणात किती पाणीसाठी?

Panjim Police: रझिया गँगच्या दोघांना गोव्यातील हॉटेलमधून अटक; चोरीचे 3.75 लाखांचे दागिने जप्त

Goa Todays Live Update: म्हादईच्या पात्रात मोठी वाढ!

Merces: मेरशी गॅस गळती प्रकरण; क्लोरिन सिलिंडर आला कुठून? 15 दिवसांत उत्तर द्या

SCROLL FOR NEXT