Panaji News: गोवा मुक्तीदिनाच्या निमित्ताने गोवा राज्य सरकारने मुक्तिसंग्रामात सामील असलेल्या १४ कुटुंबांचा बहुमान करण्याचा निर्णय घेतला आहे. गोवा मुक्ती संग्रामात सर्वस्व अर्पण केलेल्या वीरांच्या योगदानाला खरं तर बदल्यात काही दिलं जाऊ शकत नाही, पण त्यांच्या योगदानाचा योग्य तेवढा सन्मान करण्यासाठी गोवा सरकारने या कुटुंबांना प्रत्येकी १० लाख रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे.
गोवा मुक्ती संग्रामात बलिदान दिलेल्या हुतात्म्यांच्या शौर्याला आणि समर्पणाला आत्तापर्यंत कुठल्याही सरकारने एवढा मोठा बहुमान दिला नव्हता. गोव्यात झालेल्या मुक्ती संग्रामाच्या स्मरणोत्सवाची ही अनोखी कल्पना प्रमोद सावंत सरकार राबवणार आहे. मुक्ती संग्रामात काही नावं अशीही होती ज्यांचा कधीही बहुमान झाला नाही, किंवा त्यांच्या शौर्याला वंदन केलं गेलं नाही. आता मात्र गोवा सरकारने अशा १४ कुटुंबियांना शोधून काढलं असून यंदाच्या वर्षी या कुटुंबीयांचा गौरव केला जाईल.
कदाचित तुम्ही आश्चर्यचकित व्हाल पण या १४ कुटुंबीयांमध्ये बाळाराया मापारी यांच्या कुटुंबाचा देखील समावेश आहे. वर्ष १९५५ मध्ये बाळाराया मापारी यांना पोर्तुगीजांनी पकडलं होतं.
पोर्तुगीजांच्या अमानुष छळासमोर न झुकता शेवटपर्यंत साथीदारांची नावं उघड न केलेले बाळाराया मापारी यांनी १८ फेब्रुवारी १९५५ रोजी पोर्तुगीजांच्या तावडीत असतानाच अखेरचा श्वास घेतला होता, बाळाराया मापारी हे गोवा मुक्ती संग्रामात आहुती देणारे पहिले वीर होते.
यंदाच्या वर्षी मुक्तीदिनाच्या निमित्ताने बाळाराया मापारी यांच्यासोबतच बसवराज हुडगी, शेषनाथ वाडेकर, तुळशीराम बाळकृष्ण हिरवे, बाबुराव केशव थोरात, सखाराम यशवंत शिरोडकर, रोहिदास मापारी, यशवंत सुखा आगरवडेकर, रामचंद्र नेवगी, बापू विष्णू गवस, बाबला धोंडो परब, लक्ष्मणभाई साळवे, लक्ष्मण सावंत, नरेश पाटील आणि डॉ. परशुराम श्रीनिवास आचार्य यांच्या कुटुंबीयांचा सन्मान होणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.