पणजी: वटपौर्णिमा सणाच्या निमित्ताने संपूर्ण राज्यभर १० लाख वडाची रोपटी लावण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यासाठी जैवविविधता मंडळामार्फत पुढील महिनाभर मोफत वडाच्या रोपट्यांचे वाटप केले जाईल, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सोमवारी सांगितले.
वटपौर्णिमेनिमित्त दिवाडी येथे आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी आमदार राजेश फळदेसाई, जैवविविधता मंडळाचे सदस्य सचिव प्रदीप सरमोकादम आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
वटपौर्णिमा हा निसर्गाशी नाते जपणारा सण आहे. जैवविविधतेच्या दृष्टीने वड अतिशय महत्त्वाचा आहे. त्याची मुळे पाण्याची मोठ्या प्रमाणात साठवून करून ठेवतात. त्यामुळे या सणाच्या निमित्ताने राज्यभर दहा लाख वड लावण्याचा संकल्प सरकारने केला आहे.
त्यासाठी जैवविविधता मंडळामार्फत पुढील महिनाभर मोफत वडाच्या रोपट्यांचे वितरण करण्यात येणार आहे. त्याचा लाभ घेऊन सर्वांनी आपापल्या पंचायत प्रभागात वडाची रोपटी लावावी, असे मुख्यमंत्री म्हणाले. गेल्या काही वर्षांत राज्यातील सुमारे शंभर वड कोसळले आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारच्या ‘मन की बात’ कार्यक्रमात बोलताना देशातील सर्वांत स्वच्छ गाव मिझोराम या राज्यात असल्याचे सांगितले होते, याकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधले.
‘कोटी तीर्थ’मुळे पर्यटक वळतील दिवाडीकडे
‘कोटी तीर्थ’सारखे पर्यावरणास हानी न पोहोचणारे अनेक प्रकल्प पुढील काळात दिवाडीत उभे राहणार आहेत. पर्यटकांना दिवाडीकडे आकर्षित करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. या प्रकल्पामुळे दिवाडीत येणाऱ्या पर्यटकांची संख्या हजारोंवर जाईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. शिवाय दिवाडीतील नागरिकांसाठी पुढील महिनाभरात मोफत रो-रो फेरीबोट सेवा उपलब्ध करून दिली जाईल.
दिवाडी गाव राज्यात किंबहुना देशात ‘स्वच्छ गाव’ म्हणून नावारूपास येऊ शकतो. त्यादृष्टीने स्थानिकांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यांनी स्वत:हून दिवाडीला प्लास्टिकमुक्त केले पाहिजे.
- डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.