पणजी: गोव्यातून दरवर्षी पंढरपूरला येणाऱ्या हजारो वारकऱ्यांना आर्थिक मदत देण्याबाबतचा खासगी ठराव पावसाळी अधिवेशनात एकमाताने मंजूर झाला. यासाठी योजना तयार करण्याची ग्वाही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.
तसेच, पंढरपूर येथे वारकरी भवन उभारण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जागेसाठी मागणी करणारे पत्र लिहल्याची माहिती सावंत यांनी सभागृहात दिली. गोवा ते पंढरपूर पायी वारी करणाऱ्यांना मानधन देण्याची मागणी करणारा खासगी ठराव प्रेमेंद्र शेट यांनी केला होता.
मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट यांनी अधिवेशात, "दरवर्षी पंढरपूरला पायी वारी करणाऱ्या वारकऱ्यांनी आर्थिक मदत देण्यात यावी", असा मागणी करणारा खासगी ठराव मांडला. विशेषत: आषाढी कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरला जाणाऱ्य़ा वारकऱ्यांचा उल्लेख त्यांनी यावेळी केला. दरवर्षी गोव्यातून हजारो भाविक स्वत:च्या खर्चाने पायी वारी करतात, सरकराने त्यांना मानधन देण्यासाठी काही तरी तरतूद करावी, अशी मागणी शेट यांनी केली.
प्रमेंद्र शेट यांनी मांडलेल्या खासगी ठरावाला आमदार चंद्रकांत शेट्ये, आल्टन डिकॉस्टा, देविया राणे, जीत आरोलकर, वीरेश बोरकर, उल्हास तुयेकर, विजय सरदेसाई, कृष्णा साळकर, मायकल लोबो, कार्लुस फेरेरा आणि विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी याला समर्थन दिले.
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गेल्या वर्षी (जुलै २०२४) याबाबत आश्वासन दिले होते. मग एक वर्षापासून मुख्यमंत्री काय करतायेत, असा सवाल सरदेसाईंनी उपस्थित केला. पंढरपूर महाराष्ट्रात यात्रा भरते पण महराष्ट्र सरकारला देखील हे जमले नाही, अवघड आहे मान्य आहे पण एक वर्षापासून गर्व से कहो हम हिंदू है म्हणणारे झोपले होते का? असे सरदेसाई म्हणाले.
यासाठी एक हज समितीसारखी समिती नेमण्याची मागणी देखील विजय सरदेसाई यांनी केली. पंढरपूरची वारी हा केवळ यात्रेचा प्रवास नसून भक्ती आणि आस्था आहे. या परंपरेचा आदर करुन वारकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केली.
यासाठी एक ठोस योजना तयार करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सभागृहात दिले. समाजकल्याण किंवा कला आणि संस्कृती विभागाच्या माध्यमातून ही योजना सुरु करता येईल हे पडताळून ही योजना तयार केली जाईल. वारकऱ्यांची संख्या, नोंदणीकृत संस्थांची माहिती घेतली जाईल, असे सावंत म्हणाले.
वारीला जायच्या दोन महिन्यापूर्वी वारकऱ्यांनी नोंदणी केल्यानंतर वारी सुरु होण्यापूर्वी त्यांच्या खात्यात पैसे जमा होतील. योजनेसाठी अर्थसंकल्पात आर्थिक तरतूद करण्याचे आश्वासन देखील मुख्यमंत्र्यांनी सभागृहात दिले.
विठ्ठल मंदिराच्या जवळ किंवा पंढरपूर तालुक्यात वारकरी भवन उभारण्यासाठी जागा देण्यात यावी यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहल्याची माहिती देखील मुख्यमंत्री सावंत यांनी यावेळी दिली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.