पणजी: गेल्या दशकभरात गोव्यातील वृक्षराजीत लक्षणीय घट झाल्याचे केंद्रीय सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने काल प्रसिद्ध केलेल्या ‘एन्विस्टॅट्स इंडिया २०२५ : पर्यावरणीय सांख्यिकी’ अहवालातून स्पष्ट झाले आहे.
२०१०-११ मध्ये गोव्यातील एकूण वृक्षराजी क्षेत्र ३३४ चौरस किलोमीटर होते. मात्र, २०२१-२२ पर्यंत हे क्षेत्र घटून केवळ २५८ चौरस किलोमीटरवर पोहोचले असून, ही ७६ चौरस किलोमीटर म्हणजेच तब्बल २२.७५ टक्के घट दर्शवते. ही घट पर्यावरणासाठी आणि जैवविविधतेसाठी गंभीर इशारा मानली जात आहे.
हा अहवाल गोव्याच्या पर्यावरणीय स्थितीवर एक संमिश्र चित्र उभे करतो. जरी काही बाबतीत सकारात्मक कल दिसत असला, तरी वृक्षराजी व मासे उत्पादनातील घट, धोकादायक कचऱ्याची वाढ आणि नैसर्गिक आपत्तींचा प्रभाव लक्षात घेता पर्यावरण संवर्धनासाठी अधिक ठोस उपाययोजना राबवण्याची वेळ आली आहे. राज्य सरकारने विकास व पर्यावरण यांच्यातील समतोल राखण्यासाठी अधिक सजग राहण्याची आवश्यकता यातून अधोरेखित होते.
मासे उत्पादनातही घट :
२०२२-२३ मध्ये गोव्यातील मासे उत्पादन १४०.३१ टन होते. मात्र, २०२३-२४ मध्ये ते १३५.७३ टनांवर घसरले, जी एक लक्षणीय घट असून याचा पर्यावरणीय, हवामान बदल आणि अत्याधिक मासेमारी यांसारख्या घटकांशी संबंध आहे.
वनक्षेत्रात किरकोळ घट :
गोव्यातील वनक्षेत्र २०२१ मध्ये २,२६७.२२ चौरस किलोमीटर होते. हे क्षेत्र २०२३ मध्ये कमी होऊन २,२६५.७२ चौरस किलोमीटर झाले आहे. ही किंचित घट असली तरी सतत कमी होत जाण्याचा कल लक्षात घेता याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.
धोकादायक कचऱ्यात मोठी वाढ :
वार्षिक परताव्यानुसार गोव्यातून निर्माण होणाऱ्या धोकादायक कचऱ्याचे प्रमाण २८,४८४ मेट्रीक टनावरून वाढून ४४,८७३ मेट्रीक टनावर गेले आहे. ही वाढ प्रदूषण आणि कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन न होण्याचे द्योतक आहे.
संधानविहीन घरांची टक्केवारी :
गोव्यातील ३.७ टक्के कुटुंबांकडे स्वच्छतागृहाची सुविधा नाही किंवा ती मोकळ्या जागेत नैसर्गिक विधीसाठी जातात. ‘स्वच्छ भारत अभियाना’च्या पार्श्वभूमीवर ही माहिती चिंताजनक आहे.
मासेमारीवर अवलंबून लोकसंख्या :
राज्यातील ४१ मासेमारी खेड्यांमध्ये एकूण १२,६५१ मच्छीमारांची लोकसंख्या आहे. पर्यावरणीय बदलांचा सर्वाधिक परिणाम याच समुदायावर होत असल्याचे निदर्शनास येते.
झोपडपट्टीतील लोकसंख्या :
गोव्यातील एकूण लोकसंख्येपैकी २.८९ टक्के लोक झोपडपट्ट्यांमध्ये राहतात, अशी माहितीही या अहवालात नमूद आहे.
२०२२ अखेर गोव्यातील नोंदणीकृत वाहनांची संख्या १०.२० लाखांवर पोहोचली आहे. ही आकडेवारी लक्षात घेता वाहतुकीवरील ताण आणि प्रदूषणाच्या वाढीचा अंदाज लावता येतो. गोव्यातील २१,९६०.९७ हेक्टर क्षेत्र सेंद्रिय शेतीअंतर्गत नोंदणीकृत असून, यापैकी १२,२८७.४० हेक्टर क्षेत्र शेतीखाली आणि ९,६७३.५७ हेक्टर क्षेत्र वन्य साठा (वाइल्ड कलेक्शन) अंतर्गत येते. सेंद्रिय शेतीस प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने ही सकारात्मक बाब आहे.
राज्यात नद्या वा तलावांमध्ये सांडपाणी सोडणारे कोणतेही अत्यंत प्रदूषक उद्योग नाहीत, हे विशेष उल्लेखनीय आहे.
२०२३-२४ या कालावधीत ८ लोकांचे मृत्यू आणि २९० घरांचे नुकसान झाले. तर २०२४-२५ च्या तात्पुरत्या आकडेवारीनुसार ४ मृत्यू आणि ६९६ घरे नुकसानग्रस्त झाली आहेत. यावरून नैसर्गिक आपत्तींचा वाढता प्रभाव स्पष्ट होतो.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.