पणजी, भारतात काजू लागवड मोठ्या प्रमाणात आहे, परंतु प्रती हेक्टरमागे मिळणारे उत्पादन कमी आहे. आपल्याकडे एकदा काजूचे रोप लावले, की त्यानंतर त्याची निगा राखली जात नाही. गोव्यातही हीच अवस्था आहे.
त्यामुळे मोठे उत्पादन मिळत नाही. शेतकऱ्यांनी उत्पादन वाढीसाठी तंत्रज्ञानाच्या साहाय्याने काजूची निगा राखणे गरजेचे असल्याचे काजूगर आणि कोको विकास संचालनालयाचे तांत्रिक सल्लागार डॉ. व्यंकटेश हुबळी यांनी सांगितले.
काजू महोत्सवानिमित्त कला अकादमीत आयोजित ‘काजूसाठीचे तंत्रज्ञान आणि गोव्याच्या दृष्टिकोनातून ग्राहकांच्या अपेक्षा’ या विषयावरील चर्चासत्रात ते बोलत होते. या चर्चासत्रात काजू संशोधन संचालनालय पुत्तूरचे निवृत्त वैज्ञानिक एम. जी. नायक, काजूगर आणि कोको विकास संचालनालयाचे उपसंचालक डॉ. दादासाहेब देसाई यांनी सहभाग घेतला.
भारतात ११.८५ लाख हेक्टर क्षेत्रफळात काजू लागवड होते, तर ७.८ लाख मेट्रिक टन काजू उत्पादन होते जे अतिशय कमी आहे. कंबोडिया, व्हिएतनामसारखा देश उत्पादनात आमच्या पुढे चालला आहे. देशभरात सुमारे ६ हजार काजू प्रक्रिया कारखाने होते, आता त्यांची संख्या ३ हजारांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे उत्पादन वाढीसाठी अधिक उत्पादन देणाऱ्या काजूच्या झाडांची लागवड करणे त्यांची निगा राखणे गरजेचे आहे, असेही डॉ. हुबळी यांनी सांगितले.
दरम्यान, हा काजू महोत्सव पाहण्यासाठी आज कांपाल - पणजी परिसरात मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे काही वेळ वाहतुकीचीही कोंडी झाली.
योग्य दर मिळाल्यास उत्पादन वाढेल
भारतात सुमारे ५४० प्रकारच्या प्रजातींची काजूची झाडे उपलब्ध आहेत. काही काजू ६ महिने उत्पादन देतात, काही २ महिने, तर काहींचा मोहोर ऑक्टोंबरमध्ये येतो. काजू व बोंडू लहान, मोठे व मध्यम आकाराचे असणाऱ्या काजूचे प्रकार आहेत. आपणाला कोणत्या प्रकारची तसेच कोणत्या लागवडीची गरज आहे, त्यानुसार काजूची रोपे लावावी. शेतकरी काजू लागवड करतात, परंतु त्यांच्यासमोर केवळ समस्या असते ती काजूला मिळणारा भाव, काजूला योग्य दर मिळाल्यास निश्चितपणाने उत्पादनात वाढ होईल, असे एम. जी. नायक यांनी सांगितले.
काजू उत्पादकांना हवा हमीभाव
राज्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला योग्य भाव मिळत नाही. त्यासाठी ते संघर्ष करत आहेत. बाहेरून आयात करण्यात येणाऱ्या काजूमुळे गोव्यातील शेतकऱ्याला फटका बसत आहे. गोव्यातील सर्वच शेतकऱ्यांकडे कृषी कार्ड नाही. त्यामुळे सर्वांनाच हमीभाव मिळत नाही. शेतकऱ्यांच्या उत्पादनाला योग्य भाव मिळाला, तर शेतकरी तरेल व उत्पादनात वाढ होईल असे चर्चासत्रात प्रश्नोत्तरावेळी आदर्श कृषी संस्थेचे अध्यक्ष प्रकाश वेळीप यांनी सांगितले.
यंदा ५० टक्केच काजू उत्पादन ः आल्फोन्सो
पणजी, ता. १० (प्रतिनिधी) ः राज्यात नोव्हेंबरमध्ये पडलेला अवकाळी पाऊस, त्यानंतर हिवाळ्याला झालेल्या विलंबांमुळे काजूला मोहर धरण्यावेळी जी उष्णता हवी असते ती मिळाली नाही. त्याचा परिणाम काजू पिकावर झाल्याने यंदा दरवर्षीच्या तुलनेत सुमारे ५० टक्के पीक आले असल्याचे कृषीसंचालक नेव्हील आल्फोन्सो यांनी ‘काजू फेस्ट’ दरम्यान आयोजित चर्चासत्रात माध्यमांशी बोलत होते.
दरम्यान आल्फोन्सो म्हणाले, ‘काजू फेस्ट’निमित्त आयोजित चर्चासत्रांमध्ये उत्पादन कसे वाढवायचे, आपल्यासमोर कोणते अडथळे येत आहेत. हवामानात बदल होत असल्याने ते कसे दूर करायचे, यावर चर्चा करण्यासाठी तांत्रिक सत्राचे आयोजन करण्यात आली आहे, गोव्यात काजू हे मुख्य पीक आहे. सध्या शेतकरी पारंपरिक पद्धतीने काजूचे उत्पादन घेत आहेत. परंतु जर आपल्याला उत्पादन वाढवायचे असेल, तर तंत्रज्ञानाची मदत घेत पारंपरिक पद्धतीसोबतच नवीन प्रणाली स्वीकारली पाहिजे. जेणेकरून उत्पादनात वाढ होईल.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.