पणजी: राज्यात गेल्या पाच वर्षांत नद्या, कालवे, खंदक, दगडखाणी, धबधबे तसेच इतर जलसाठ्यांमध्ये स्थानिक आणि पर्यटक मिळून ४१९ जणांना जलसमाधी मिळाली. २०२३ मध्ये अशा घटनांमध्ये सर्वाधिक ९२ जणांचा मृत्यू झाला आहे.
नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी विधानसभेत विचारलेल्या लेखी प्रश्नाच्या उत्तरातून महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी सादर केलेल्या आकडेवारीतून ही माहिती समोर आली आहे.
गेल्या पाच वर्षांत राज्यातील नद्या, कालवे, खंदक, दगडखाणी, धबधबे तसेच इतर जलसाठ्यांमध्ये बुडून किती जणांचा मृत्यू झाला, असा प्रश्न विचारत मृत पावलेल्यांची माहिती, त्यांची नावे, वय, पत्ते आणि घटना कुठे घडली, याचीही माहिती आलेमाव यांनी मागितली होती.
त्यानुसार मंत्री मोन्सेरात यांनी बुडालेल्यांची सविस्तर माहिती सादर केली आहे. राज्यात दरवर्षी वाढत असलेल्या अशा घटना रोखण्यासाठी राज्य सरकारने कोणत्या उपाययोजना केल्या आहेत, असाही प्रश्न विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी विचारला होता. त्यावर सरकारने सर्वच खंदक, दगडखाणींभोवती कुंपण घालण्याचे निर्देश जारी केले आहेत. यंदाही खंदकामध्ये बुडून काहीजणांचा मृत्यू झाल्याने त्याचे पडसाद विधानसभेतील कामकाजावेळी उमटले होते. याविषयी ठोस उपाय योजणे गरजेचे आहे.
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ च्या कलम १६३ अंतर्गत दोन्ही जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिक, पर्यटकांसाठी निश्चित केलेले धबधबे सोडून इतर धोकादायक धबधबे, खंदक, नद्या, तलाव आणि इतर नैसर्गिक जलसाठ्यांमध्ये प्रवेश करण्यास मनाई घातली आहे. स्थानिक तसेच राज्यात येणाऱ्या पर्यटकांनी धोकादायक ठिकाणी जाऊन पाण्यात उतरू नये, यासाठी जागृतीही करण्यात येत आहे, असे मंत्री बाबूश मोन्सेरात यांनी स्पष्ट केले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.