सासष्टी: नीट परीक्षेतील कथित पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाने गुरुवारी मडगावात निदर्शने करत भाजपच्या दक्षिण गोवा जिल्हा कार्यालयावर मोर्चा काढला. काँग्रेसच्या राष्ट्रीय युवा समितीचे अध्यक्ष उदय भानू चीब, पक्षाचे सरचिटणीस व गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे यांच्या उपस्थितीत हे आंदोलन पार पडले.
मोर्चा भाजपच्या दक्षिण गोवा जिल्हा कार्यालयापर्यंत नेण्यात आला. यावेळी बोलताना उदय भानू चीब यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली. नीट पेपरफुटीमुळे देशभरातील लाखो विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर पाणी फिरल्याचा आरोप त्यांनी केला. युवकांचे भविष्य धोक्यात घालणाऱ्या या प्रकाराला केंद्र सरकार जबाबदार असल्याची टीकाही त्यांनी केली.
भाजप सरकारकडून ‘डिजिटल इंडिया’, ‘न्यू इंडिया’ आणि ‘स्किल इंडिया’सारख्या घोषणा केल्या जात असल्या तरी युवकांना त्यांचे हक्क आणि संधी मिळवून देण्यात सरकार अपयशी ठरत असल्याचे उदय चीब म्हणाले. शिक्षण क्षेत्राचे व्यापारीकरण होत असल्याचा आरोप करत विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी काँग्रेस कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
भवितव्याशी खेळ!
माणिकराव ठाकरे यांनीही केंद्र सरकारवर टीका करत युवकांचे भविष्य धोक्यात आले असल्याचे सांगितले. भाजप एकीकडे युवकांना देशाचे भविष्य म्हणते, तर दुसरीकडे त्यांच्या भवितव्याशी खेळ होत असल्याचा आरोप त्यांनी केला. नीट परीक्षेतील पेपरफुटीमुळे गरीब आणि सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांवर अन्याय झाला असून, या विरोधात युवकांनी एकजूट दाखविण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.