पणजी: गोव्यात नेतृत्वबदल व मंत्रिमंडळाची संपूर्ण पुनर्रचना या केवळ अफवा असल्याचे सांगून नेतृत्वबदलासाठी कोणी राजी नाही; गोव्यात नवीन राजकीय प्रयोग शक्य नसल्याचे दिल्ली पक्षश्रेष्ठींचे म्हणणे आहे.
"आमदार नसलेल्यांना गोव्यात आणून गोव्यात संपूर्ण नवीन राजकीय प्रयोग करण्याची कोणाची इच्छा नाही," असे स्पष्टीकरण गोव्याशी संबंधित भाजप संघटनात्मक सूत्रांनी 'गोमन्तक'ला दिले.
पेडणेचे आमदार प्रवीण आर्लेकर यांना दिल्लीला बोलावले आहे. त्यांना राजीनामा द्यावा लागून नेतृत्वबदल होऊ शकतो. आर्लेकर यांच्या जागी संघटनात्मक पदांवर महत्त्वपूर्ण कार्य केलेल्या नेत्याची वर्णी लागू शकते, असे राजकीय भाकीत सध्या गोव्यात वर्तविले जात आहे.
गोव्यात मुख्यमंत्री बनण्याच्या अनेकांच्या सुप्त इच्छा आहेत. परंतु एकतर वेळ आलेली नाही; किंवा ते व्यावहारिक तरी नाही, अशी प्रतिक्रिया आपले नाव जाहीर न करण्याच्या अटीवर एका ज्येष्ठ नेत्याने दिली.
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याबरोबर बहुसंख्य आमदार आहेत. गोव्यात सत्तेचे समीकरण सावंत यांनी व्यवस्थित राखले आहे. तरीही काही जणांच्या मुख्यमंत्री बनण्याच्या सुप्त इच्छा अधूनमधून उफाळून येतात, असे सांगण्यात आले.
मुख्यमंत्रिपदाच्या दावेदारांना वाटते की मंत्रिमंडळात किरकोळ बदल करण्याच्या बेतात पक्षश्रेष्ठी आलेले आहेत. हाच मोका साधून त्यांना मंत्रिमंडळाची संपूर्ण पुनर्रचना करण्यासाठी राजी करता येईल. त्यात नेतृत्वबदल होण्याचीही संधी आहे.
भाजपात सध्या संघटनात्मक निवडणुकांची तयारी जोरात चालली असून पक्षाचे सर्व ज्येष्ठ नेते त्यात गुंतले आहेत. सुमारे दोन लाख बूथ समित्यांची पुनर्रचना केली जात असून वरपासून खालपर्यंत पक्षसंघटनेची पुनर्रचना होऊ घातली आहे. या पार्श्वभूमीवर गोव्याकडे पाहायला कोणाला वेळ नाही.
"मंत्रिमंडळातील किरकोळ बदल करण्यास पक्षश्रेष्ठी तयार आहेत. परंतु संपूर्ण पुनर्रचना व नेतृत्वबदल यासाठी सखोल चर्चा व वेळ आवश्यक आहे. पुन्हा आमदार नसणाऱ्यांना गोव्यात आणणे; त्यांना पुन्हा विधानसभेवर जिंकून आणणे यासाठी जो अवधी आवश्यक आहे, तो सध्या कोणाकडे नाही. दुसरे वाद जरी कितीही असले तरी नेतृत्वबदल करण्यासारखी परिस्थिती उद्भवलेली नाही," असे मत दिल्लीच्या सूत्रांनी व्यक्त केले.
सूत्रांनी सांगितले, की पेडणेचे आमदार प्रवीण आर्लेकर यांना कोणाही जबाबदार नेत्याने दिल्लीत बोलविले नव्हते. सध्या मंत्रिमंडळ बदलाच्या संभाव्य चर्चेतूनच अनेकांनी दिल्ली गाठून स्वतःचे घोडे दामटले आहे. वास्तविक ज्या कोणी दिल्ली गाठली, त्यांपैकी कोणीही नेतृत्वबदलाची चर्चा केलेली नाही; त्यांना पक्षश्रेष्ठींनी बदलाचे संकेत दिलेले नाहीत. तरीही काही हितसंबंधी घटक वृत्तपत्रांना बातम्या सोडतात व प्रसारमाध्यमे आपल्या फायद्या तोट्याचा विचार करून या बातम्या प्रसिद्ध करतात.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.