डिचोली: वास्तविक दरवर्षी डिचोलीतील काजू व्यापारी महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर ‘तागडी’ (तराजू) लावून काजू खरेदी करतात. काजू बागायतदारही महाशिवरात्रीला पिकलेल्या काजूबियांची विक्री करतात. यंदा मात्र तसे चित्र अद्याप दिसून आलेले नाही. गोवा बागायतदार या स्वयंसेवी आस्थापनांत अजूनही काजूबियांची खरेदी सुरू झालेली नाही. काजूबियांचा दरही निश्चित नमूद करण्यात आलेला नाही.
काजूपिक लांबणीवर पडल्याने अपेक्षेप्रमाणे काजूबियांची खरेदी सुरू झालेली नाही, असे शहरातील एक काजू व्यापारी विनायक शिरोडकर यांनी सांगितले. हवामान संतुलित राहिल्यास होळी पौर्णिमेपर्यंत काजूबिया बाजारात येण्याची शक्यता आहे.
दरम्यान, दारू उत्पादकांनी दारूभट्ट्या सज्ज ठेवल्या असल्या, तरी आवश्यक प्रमाणात काजू बोंडू उपलब्ध होत नसल्याने दारूभट्ट्यांची धडधडही अद्याप कानावर पडत नाही. नाही म्हटले तरी महाराष्ट्रातील काही भागांतून काजू बोंडू उपलब्ध करून दोन ते तीन दारू उत्पादकांनी ‘हुर्राक’ गाळले आहे. मात्र, दारूभट्ट्या नियमित पेटलेल्या नाहीत.
असंतुलित आणि पोषक वातावरणाच्या अभावामुळे यंदा काजूच्या झाडांना उशिराने फलधारणा प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे डिचोलीत अजूनही अपेक्षेप्रमाणे काजू पीक मिळत नाही. मार्चच्या पंधरवड्यानंतर काजू पिकाला जोर येण्याची शक्यता आहे.
गोव्यातील काजूगराच्या चवीला अन्य राज्यातील कुठलाही काजूगर लागत नाही; तरीही हवामान बदल तसेच वातावरणाचा फटका काजू उत्पादनाला बसत असल्याने बागायतदारांना झळ सोसावी लागत आहे. मात्र, गोमंतकीय काजू खरेदी करण्यासाठी गोवा बागायतदार सहकारी खरेदी विक्री संस्था आखडता हात घेत नाही, त्यामुळे दरवर्षी सुमारे अडीच हजार टन काजूबिया गोवा बागायतदारकडून खरेदी केल्या जात आहेत.
विशेष म्हणजे काजू उत्पादकांचा विश्वास गोवा बागायतदार संस्थेवर आहे, त्यामुळेच एवढ्या मोठ्या प्रमाणात ही काजू खरेदी केली जात आहे.
गोवा बागायतदारकडून राज्यातील विविध भागात काजू खरेदी केली जाते. काजू उत्पादक अर्थातच बागायतदारांना त्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. काजू उत्पादकांना दरवर्षी चांगला दर गोवा बागायतदारकडून दिला जातो. यंदाचा दर अजून ठरलेला नाही, तरीपण सरकारी दरफरकामुळे काजू उत्पादकांना हायसे वाटणे साहजिक आहे. सरकारचा दरफरक मिळण्यासाठी काजू उत्पादकांना सरकारी यंत्रणेकडे अर्ज करावे लागतात, त्यासाठी आवश्यक सोपस्कार पूर्ण केल्यानंतर ही दरफरकाची रक्कम बागायतदारांना मिळते.
दरम्यान, गेल्यावर्षी सरकारने काजूबियांना १५० रुपये हमीभाव दिला होता. यंदा तो १७० रुपये केला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.