पणजी: मंत्रिमंडळातून कोणा-कोणाला वगळणार, याबाबत जनतेतच नव्हे तर सत्ताधारी वर्तुळात उत्सुकता लागून राहिली आहे. सर्व मंत्र्यांचे राजीनामे घेऊन मंत्रिमंडळात फेरबदल करणार असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यावर चर्चेला गती मिळाली आहे. अनेकांनी दिल्लीतील आपल्या नेत्यांना, माहितगारांना फोन करून या बातमीची खात्री करून घेतली.
मंत्रिमंडळातून किमान तीन ते चारजणांना बदलले जाऊ शकते याची माहिती मिळाल्यावर या प्रतिनिधीला ती माहिती देण्याची जणू स्पर्धा सुरू झाली होती. मंत्रिमंडळात फेरबदल होणार, तोही याच आठवड्यात असे अनेकजण छातीठोकपणे सांगत होते. मात्र कोणाचा समावेश मंत्रिमंडळात केला जाईल, याबाबत कोणीही तेवढ्याच ठामपणे सांगू शकत नव्हते. आपला अंदाज ते सूत्रांची माहिती म्हणून थोपण्याचा प्रयत्न करताना जाणवले.
भाजपची बैठक पणजीत झालेली नाही. त्यामुळे या विषयाचे पुढे काय झाले हे कोणालाच समजलेले नाही. कला व संस्कृतीमंत्री गोविंद गावडे यांचे म्हणणे नोंदवून दिल्लीला पाठवायचे होते तर मग कारवाईची भाषा त्याआधीच का केली गेली? अशी विचारणा होऊ लागली आहे. दरम्यान, दिल्लीत अहवाल पाठवल्यानंतर प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनीही संघटनात्मक कामाकडे लक्ष देणे सुरू केले आहे. ते दक्षिण गोव्यात भाजप मेळाव्यांना उपस्थित रहात आहेत.
आपल्या आमदाराचा समावेश मंत्रिमंडळात होईल, या शक्यतेने अनेक ठिकाणच्या कार्यकर्त्यांमध्ये आठवडाभर उत्साह होता. आता मंत्रिमंडळ फेरबदल लांबणीवर पडू लागल्यावर तो होणार की नाही, अशी विचारणा याच कार्यकर्त्यांकडून होऊ लागली आहे. तूर्त त्याचे उत्तर कोणाकडेही नसल्याने एक प्रकारची संभ्रमावस्था निर्माण झालेली आहे. साहजिकच गेला आठवडाभर सुरू असलेली मंत्रिमंडळ फेरबदल विषयातील हवा निघून जाऊ लागली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.