काणकोण: लोलये-पैंगीण परिसरातून वाहणाऱ्या गालजीबाग नदीची स्थिती दिवसेंदिवस खालावत चालली असून त्यामुळे परिसरातील शेतजमिनी पावसाळ्यात मोठ्या धोक्यात येत आहेत. अनेक वर्षे मोकळेपणाने वाहणारी ही नदी पावसाळ्यात शेतजमिनींचे संरक्षण करत होती; मात्र नदीपात्रातील अडथळ्यांमुळे आता तीच नदी शेतकऱ्यांसाठी संकट ठरत आहे.
पर्यावरणपूरक व शास्त्रीय पद्धतीने नदीपात्र स्वच्छ करून गालजीबाग नदीचा मोकळा प्रवाह पुनर्स्थापित करावा, जेणेकरून पावसाळ्यात शेतजमिनींचे होणारे नुकसान टाळता येईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
पूर्वी स्थानिक गावकरी नदीपात्रातील झुडपे, गवत तसेच वाढलेली खारफुटी व बोंडकी नियमितपणे काढून स्वच्छता करत असत. त्यामुळे पाण्याचा प्रवाह सुरळीत राहात होता. गेल्या काही वर्षांत मात्र योग्य देखभाल न झाल्याने नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर झुडपे व खारफुटी वाढली असून, त्यामुळे पाण्याचा नैसर्गिक प्रवाह गंभीरपणे अडखळलेला आहे.
या अडथळ्यांमुळे पावसाळ्यात गालजीबाग नदी आपल्या मूळ पात्रातून वाहू शकत नाही. परिणामी नदीने आपला मार्ग बदलून थेट शेतजमिनींतून वाहण्यास सुरुवात केली आहे. यामुळे दरवर्षी पावसाळ्यात शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असून दगड, गाळ व कचरा शेतात साचत असल्याने अनेक जमिनी लागवडीस अयोग्य ठरत आहेत.
हा प्रश्न लोलये ग्रामसभेत वारंवार मांडण्यात आला असून, याबाबत ठराव मंजूर करून जलसंपदा विभागाकडे पाठविण्यात आले आहेत. त्यानंतर जलसंपदा विभागाच्या कनिष्ठ अभियंत्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून नदी स्वच्छ करणे आवश्यक असल्याचे मान्य केले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.