पणजी: मुरगाव बंदरातून वास्को शहरातील टाक्यांमध्ये इंधनपुरवठा करणारी वाहिनी बदलण्यासाठी अखेर हालचाली सुरू झाल्या आहेत. एखाद्या वाहिनीचे आयुर्मान ३०-३५ वर्षे गृहित धरून सध्याच्या वाहिनीचे आयुर्मान संपण्याआधी ती बदलण्यासाठी आता सरकारी पातळीवर प्रयत्न करण्यात येणार आहेत.
सचिवालयात आज ग्राहक व्यवहार खात्याचे सचिव संजीव गडकर यांच्याशी भारत पेट्रोलियमचे अधिकारी मिहीर जोशी यांनी चर्चा केली. सध्या मुरगाव बंदरातून या टाक्यांपर्यंत १४ किलोमीटर लांबीची वाहिनी आहे. गेल्या वर्षी तिला गळती लागल्याने राज्यातील इंधनपुरवठा धोक्यात आला होता.
मुरगाव बंदरातून ही वाहिनी घालण्यात आली तेव्हा जमीन मोकळी होती. आता त्या वाहिनीवर आणि परिसरातही अनेक बांधकामे झाली आहेत. त्यामुळे पुन्हा इंधन गळतीसारखा प्रकार उद्भवल्यास दुरुस्ती करणे कठीण होणार आहे. ते गृहित धरून अन्य ठिकाणाहून वाहिनी घालण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. सध्याच्या वाहिनीच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी झुआरी ऑईल टॅंकींग कंपनीकडे आहे.
राज्याला दररोज २ हजार किलोलीटर इंधनाची गरज भासते. भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम आणि इंडियन ऑईल या सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या ही गरज भागवतात. वास्को येथील टाक्यांमध्ये नेहमी १५ दिवस पुरेल एवढा इंधनसाठा ठेवला जातो.
मला आजच हा विषय समजला आहे. इंधन कंपन्यांकडून वाहिनी घालण्याचा प्रस्ताव आल्यावर सरकार याबाबत उचित निर्णय घेणार आहे. याविषयी अद्याप वरिष्ठांशी चर्चा व्हायची आहे. त्यामुळे अधिक तपशील सांगता येणार नाही.संजीव गडकर, सचिव, ग्राहक व्यवहार.
इंधन पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी चांगली वाहिनी असणे आवश्यक आहे. त्यासाठी सध्याच्या इंधन वाहिनीऐवजी दुसरी वाहिनी घालण्याचा विचार आहे. लोकांची सुरक्षितता लक्षात घेऊन हे पाऊल टाकले आहे.मिहीर जोशी, अधिकारी, भारत पेट्रोलियम.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.