पणजी: शिक्षण क्षेत्राच्या इतिहासात पहिल्यांदाच एप्रिलमध्ये इयत्ता सहावी ते बारावी (अकरावी वगळून) नवीन शैक्षणिक वर्षाला आजपासून सुरवात झाली. राज्यातील सर्वच भागातील शाळा आज सकाळपासून गजबजल्या. सर्व शाळांमध्ये आज सरासरी ९० टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.
विद्यार्थ्यांमध्ये उत्साह होता. काही शाळांनी विद्यार्थ्यांना फुले, फळे आणि वह्या देत विद्यार्थ्यांचे स्वागत केले. दुपारी ११.३० वा. शाळा सोडण्यात आल्या. दरम्यान, कळंगुटमधील ‘लिट्ल फ्लॉवर आॉफ जिझस हायस्कूल’च्या पालक तसेच विद्यार्थ्यांनी एप्रिल महिन्यातील वर्गावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे.
विद्यार्थ्यांना उष्म्याचा त्रास होऊ नये यासाठी बहुतांशी शाळांमध्ये योग्य ती काळजी घेण्यात आली आहे. पंखे व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
पहिल्यांदाच एप्रिलमध्ये शाळा सुरू करण्यात आल्याने विद्यार्थी, शिक्षकांचा प्रतिसाद जाणून घेण्यासाठी शिक्षण सचिव प्रसाद लोलयेकर, शिक्षण संचालक शैलेश झिंगडे आणि गोवा बोर्डचे अध्यक्ष भगीरथ शेट्ये यांनी तिसवाडी तालुक्यातील काही शाळांमध्ये भेटी दिल्या.
लोलयेकर म्हणाले, की नवीन शिक्षण धोरणाच्या अनुषंगाने एप्रिलमधून शैक्षणिक वर्ष सुरू करण्याच्या निर्णयाला राज्यभरातून चांगला प्रतिसाद लाभत असून शाळेत विद्यार्थ्यांची उपस्थिती देखील चांगली आहे.
नवीन शैक्षणिक वर्षाला सुरवात करताना काही पालकांनी शिक्षण संचालनालयाबाहेर एकत्र येत विरोध केला. यासंबंधी सांगताना पालक सिसील रॉड्रीगीस म्हणाल्या, की आम्हा पालकांना विश्वासात घेतले नाही. आमचे मुद्दे मांडण्यासाठी बैठक घेण्यासंबंधीचे आश्वासन शिक्षण सचिवांनी दिले होते, परंतु ते आश्वासन पाळण्यात आले नाही. आमचा एनईपीला विरोध नाही, परंतु ज्याप्रकारे त्याची अंमलबजावणी केली जाते, ती योग्य नाही. त्यामुळे आम्ही विरोध करत आहे. सध्या राज्यात मोठ्या प्रमाणात उष्मा जाणवत असल्याने हा निर्णय योग्य नाही.
नवीन शैक्षणिक वर्षाला ज्यांचा विरोध होता, त्यांनी न्यायालयात दाद मागितली होती. उच्च न्यायालयाने पालकांनी उपस्थित केलेल्या मुद्यांमध्ये तथ्य नसल्याचे सांगत एप्रिलमध्ये शाळा सुरू करण्याचा निर्णय दिल्यावर हा विषय संपायला हवा होता, परंतु काहीजण आताही विरोध करत आहेत. या विरोधामागचा नेमका उद्देश काय आहे हे सर्व पालकांनी ओळखणे गरजेचे आहे. ट्युशन आणि कोचिंग लॉबी पालकांना वेठीस धरण्याचा प्रयत्न करत असल्याची शंका असल्याचे शिक्षण सचिव प्रसाद लोलयेकर यांनी सांगितले.
राज्यात शाळा चांगल्या प्रकारे सुरू आहेत. सर्वांचा प्रतिसादही चांगला लाभत आहेत. सर्व शाळांना एससीईआरटीमार्फत पुस्तके पोहोचली आहेत. तरी देखील शिक्षण संचालनालयासमोर आंदोलन, मोर्चा आदी प्रकार करणे गैर आहे. जर या पालकांना निवेदन द्यायचे असेल तर ते देऊ शकतात, परंतु असे प्रकार होता कामा नये.शैलेश झिंगडे, शिक्षण संचालक
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.