सासष्टी: २०२८ पर्यंत सध्याची शैक्षणिक पद्धती टप्प्याटप्प्याने पूर्णपणे बंद होईल व सर्व वर्गांसाठी नवी पद्धती अवलंबली जाईल. नवीन शैक्षणिक धोरण उच्च माध्यमिक शाळांना पुढील वर्षापासून लागू केले जाईल. तसेच २०३० पर्यंत या पद्धतीबाबत सर्व शिक्षकांना प्रशिक्षित केले जाईल, असे शिक्षण सचिव प्रसाद लोलयेकर यांनी सांगितले.
आज उच्च माध्यमिक शिक्षण संघटनेतर्फे आयोजित कलागुरुजन महोत्सवाअंतर्गत चंद्रकांत शिंदे यांनी घेतलेल्या प्रगट मुलाखतीत लोलयेकर बोलत होते. नवीन शैक्षणिक धोरणातील बदल, शिक्षकांची जबाबदारी व अभ्यासक्रम तसेच एप्रिलपासून नवे शैक्षणिक वर्ष सुरू करण्यामागचा हेतू याबद्दल विस्तृत माहिती दिली.
लोलयेकर यांनी सांगितले की, नववी, दहावी, अकरावी व बारावी या वर्गांचा उच्च माध्यमिक स्तरावर समावेश केला असला तरी माघ्यमिक शाळांना अकरावी व बारावीचे किंवा उच्च माध्यमिक शाळांना नववी व दहावीचे वर्ग सुरू करण्याची मुळीच गरज नाही. जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांच्या अध्यक्षतेखाली माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांचे गट करण्यासंदर्भात अभ्यास सुरू आहे.
आता उच्च माध्यमिक शाळांमध्ये विज्ञान, वाणिज्य, कला, व्यावसायिक असा एकच प्रकार नसेल. भाषा, आंतर शिस्तबद्धता, गणित व विज्ञान, कला व व्यावसायिक असे विभाग केले जातील. विद्यार्थ्यांनी कमीत-कमी दोन विभागातील विषयांची निवड करावी लागेल, त्याचप्रमाणे दोन भाषा निवडाव्या लागतील. शिक्षणामध्ये तंंत्रज्ञान बदलत आहे. अभ्यासक्रमामध्ये विविध बदल होत आहेत. त्यामुळे सर्व शिक्षकांनी स्वत:ला अद्ययावत करणे गरजेचे आहे, असे लोलयेकर यांनी सांगितले.
जास्तीत जास्त उच्च माध्यमिक शाळांमध्ये एप्रिल महिन्यात बारावीचे वर्ग सुरू असत. एप्रिलमध्ये शैक्षणिक वर्ष सुरू करण्याचा निर्णय राजकारण्यांनी नव्हे तर शिक्षणतज्ज्ञांच्या समितीने घेतला आहे. तसेच चतुर्थी, दिवाळी व ख्रिसमस सुट्टीमध्ये फेरफार होऊ नये यासाठीही हा निर्णय घेतला आहे. त्याचप्रमाणे डिसेंबर महिन्यात शाळांमध्ये केवळ पिकनिक, गॅदरिंगसारखे कार्यक्रम आयोजित करण्यातच वेळ जातो. त्यामुळे हा वेळ भरून काढण्याचाही त्यामागे हेतू असल्याचे लोलयेकर यांनी सांगितले.
प्रसाद लोलयेकयांनी सांगितले की, शिक्षकांना प्रशिक्षित करण्यासाठी बंगळुरू येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सकडे सामंजस्य करार केला आहे. त्यामुळे काही शिक्षकांना तिथे पाठविले जाते. गोव्यात ‘एससीईआरटी’मध्ये शिक्षकांसाठी प्रशिक्षण केंद्र सुरू केले जाईल, शिक्षकांना तांत्रिक प्रशिक्षणही दिले जाईल. शिक्षकांचा दर्जा वाढविला जाईल.
विद्यार्थ्यांची योग्यता समजून घेण्यासाठी पाचवी व आठवी इयत्तेसाठी ‘एससीईआरटी’ किंवा शिक्षण मंडळातर्फे परीक्षेचा पेपर तयार केला जाईल. मात्र, तपासणी शाळेतच केली जाईल. ही मंडळाची परीक्षा अशी समजूत कुणीही करून घेऊ नये. प्रत्येक शाळांमधील जो अभ्यासक्रम शिकवला जाईल त्यामध्ये एकसारखेपणा व संतुलन राखण्यासाठी ही परीक्षा असेल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.