साखळीतील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील रस्त्यांना रविवारी सकाळपासून नदीचे स्वरूप आले होते. या भागातील मुख्य रस्त्याला लागून असलेल्या गटारांमधील पाणी बाहेर आल्याने संपूर्ण रस्ता पाण्याखाली गेला. त्यामुळे दुचाकी व पादचाऱ्यांना नाहक त्रास झाला.
साखळी सरकारी सामाजिक आरोग्य केंद्र ते गोकुळवाडी येथील भाजप कार्यालयापर्यंत असलेल्या मुख्य रस्त्याच्या बाजूला बांधण्यात आलेल्या गटारांमधील पाणी दरवर्षी भाजप कार्यालयाच्या परिसरात बाहेर येते आणि रस्त्यावरून वाहू लागते. त्यामुळे या भागात जलमय स्थिती निर्माण होत असते. नगरपालिका आपल्या पद्धतीने दरवर्षी गटार साफसफाई काम हाती घेते. परंतु या गटारांमध्ये कचरा अडकल्यानंतर पुन्हा ती तुंबतात आणि पाणी रस्त्यावरून वाहू लागते.
रविवारी सकाळीपासून मुसळधार व सततपणे पडलेल्या पावसामुळे या गटारातील मोठ्या प्रमाणात अतिरिक्त पाणी हे रस्त्यावरून वाहू लागले होते. हा मुख्य रस्ता असल्याने या रस्त्यावरून वाहनांची मोठी वर्दळ सुरूच असते. या वाहनांमुळे या रस्त्यावरील पाणी रस्त्याच्या बाजूला चालणाऱ्या पादचाऱ्यांवर उसळत होते. तसेच दुचाकी स्वारांनाही या पाण्याचा अभिषेक होत होता. पाण्याचा प्रवाहही मोठा होता.
मुख्य रस्त्याच्या बाजूला.बांधण्यात आलेल्या गटारांवर थेट काँक्रीट घालून त्यावर फुटपाथ साकारण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे या गटारांची पावसापूर्वी योग्यपणे साफसफाई होत नाही. परिणामी माती व कचऱ्याने तुंबलेल्या या गटारांमधील पाणी बाहेर येऊन रस्त्यावरून वाहते. याकडे नगरपालिकेने लक्ष देऊनही गटारे साफ करावी, अशी मागणी साखळी व्यापारी, संघटनेचे अध्यक्ष प्रियेश डांगी यांनी केली.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.