Goa CM and officials Mahakumbh visit
पणजी: विविध कल्याणकारी योजनांचा लाभ दर महिन्याला देणे सरकारला जड जात असतानाच उद्या मंगळवारी मुख्यमंत्र्यांसह, मंत्री, आमदार आणि शंभरेकजण विशेष विमानाने महाकुंभात डुबकी मारण्यासाठी प्रयागराजला रवाना होणार आहेत. सकाळी ७ वाजता दाबोळी येथून हे खास विमान निघेल.
या प्रकाराचा फार मोठा गवगवा होऊ नये यासाठी काही पत्रकारांनाही सोबत नेण्याची युक्ती योजण्यात आली आहे. त्यांनाही पावन’ करण्याचा मानस रचण्यात आला आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, त्यांची पत्नी सुलक्षणा व मुलगी पार्थवी प्रयागराजला जाणार आहे. मात्र त्यांचे वडील पांडुरंग या दौऱ्यात सहभागी होणार नाहीत.
शिवाय मंत्रिमंडळातील सहकारी सपत्नीक व आमदारही आपल्या कुटुंबीयांसह या दौऱ्यात सहभागी होणार आहेत. याबाबतची माहिती बाहेर फुटणार नाही याची काळजी गेले चार दिवस घेण्यात येत होती, तरीसुद्धा आज सायंकाळी ती फुटलीच. याआधी मुख्यमंत्र्यांनी काही निवडक जणांसह असाच अयोध्या दौरा केला होता. दाबोळीवरून प्रयागराजला सकाळी झेपावणारे विमान उद्याच रात्री गोव्यात परतणार आहे.
राज्य सरकार राज्यातील भाविकांना प्रयागराज येथे जाण्यासाठी सवलतीच्या दरात रेल्वे तिकीटे उपलब्ध करणार आहे. येत्या चार दिवसांत त्याबाबतची माहिती जाहीर केली जाईल. प्रयागराज येथे या भाविकांची सोय करण्यासाठी समन्वयक अधिकारी नियुक्त केला जाणार आहे. प्रयागराज येथे गोव्यातून येणाऱ्या खास रेल्वेच्या माध्यमातून ही सेवा दिली जाणार आहे.
मुख्यमंत्र्यांच्या जैसलमेर येथील दौऱ्यात चार्टर विमानाचा वापर झाल्याने नंतर टीका झाली होती. याचा खर्च राज्य सरकारला कसा काय परवडतो? अशी विचारणा विरोधी पक्षाकडून करण्यात आली होती. धार्मिक पर्यटन आणि परंपरांचा सन्मान राखणे महत्त्वाचे आहे, मात्र राज्याची आर्थिक परिस्थिती विचारात घेतल्यास अशा खर्चीक दौऱ्यांचा प्राथमिक हेतू काय, हे स्पष्ट केले पाहिजे अशी चर्चा या निमित्ताने ऐकू येत आहे. विशेष विमानांच्या भाड्याचा आणि शिष्टमंडळाच्या इतर खर्चाचा भार जनतेच्या पैशावर पडतो.
राज्य सरकारने सवलतीच्या दरात राज्यातील जनतेला रेल्वेने प्रयागराज येथे १४४ वर्षांनी भरलेल्या कुंभमेळ्यात सहभागी होण्याची व्यवस्था केली. त्यासाठी प्रयागराज येथे खास अधिकारी तैनात करून तेथे सारी व्यवस्था करण्याची तयारी दर्शवल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. आपल्या दौऱ्यावर टीका होऊ नये यासाठी अशी व्यवस्था केली असावी याचा अंदाज आल्याने त्यासंदर्भात माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता या जंबो दौऱ्याची माहिती हाती आली. या दौऱ्यात मुख्यमंत्री कार्यालय व राज्य प्रशासनातील बड्या अधिकाऱ्यांनाही सहभागी करून घेण्यात आले आहे. मंत्री, आमदार आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपल्या कर्तव्यांपासून दूर राहून सार्वजनिक निधीचा अपव्यय करण्याऐवजी लोकांच्या प्रश्नांवर काम करायला हवे असेही बोलले जात आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.