साखळी : सुमारे महिनाभरानंतर येथील रवींद्र भवनात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा ‘जनता दरबार’ शनिवारी (२८ मार्च) पुन्हा एकदा भरला. या दरबारात मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थिती लावली होती.
फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस विधानसभा अधिवेशन व अर्थसंकल्पीय कामकाजाच्या पार्श्वभूमीवर जनता दरबार स्थगित करण्यात आला होता. त्यानंतर मुख्यमंत्री आरोग्य तपासणीसाठी पुण्यात गेले होते.
त्यामुळे मागील आठवड्यातही दरबार होऊ शकला नव्हता. पुण्यातून परतल्यानंतर त्यांनी साखळीतील एका कार्यक्रमात उपस्थित काही नागरिकांशी संवाद साधला होता. या पार्श्वभूमीवर यावेळी ‘जनता दरबार’ होणार याची खात्री असल्याने साखळी तसेच इतर मतदारसंघांतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अनेक जण आपापल्या समस्या मांडण्यासाठी आले होते, तर काही जण केवळ मुख्यमंत्र्यांच्या आरोग्याची विचारपूस करून शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेत संबंधित अधिकाऱ्यांना तत्काळ सूचना दिल्या. काही प्रकरणांमध्ये त्यांनी थेट अधिकाऱ्यांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधण्याचे निर्देश दिले.
यावेळी काही महिलांनी मुख्यमंत्र्यांच्या आरोग्याबाबत काळजी व्यक्त करत सल्ला दिला. त्यावर मुख्यमंत्र्यांनी आपण ठणठणीत असल्याचे सांगत महिलांनाही साखळी सरकारी सामाजिक इस्पितळात सुरू असलेल्या ‘चेक्ड बाय दोतोर’ मोहिमेचा लाभ घेऊन स्वतःची आरोग्य तपासणी करून घेण्याचा सल्ला दिला. सुमारे दोन तास चाललेल्या या जनता दरबारात मुख्यमंत्र्यांनी नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. सर्वांना भेटूनच ते पुढील कार्यक्रमासाठी रवाना झाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.