पणजी: बऱ्याच कालावधीनंतर १५ मार्च रोजी ग्रामसभा घेण्याचा निर्णय चिंबल सरपंचांनी घेतला खरा. मात्र, ग्रामस्थांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात असल्याने ही सभा खुल्या जागेत घ्यावी, अशी सूचना ग्रामस्थांनी केली.
सरपंच संदेश शिरोडकर यांनी ग्रामस्थांची सूचना फेटाळून लावत शाळांच्या खोल्यांमध्येच सभा घेतल्याने ग्रामस्थांचा राग अनावर झाला. त्यांनी सरपंचांविरोधात जोरदार घोषणाबाजी करीत सरपंच अहंकारी असून उन्मत्तपणे वागत असल्याचा आरोप केला. सुमारे तीन तासांच्या गोंधळानंतर ही ग्रामसभा पुढे ढकलली.
ऑक्टोबर २०२५ पासून ग्रामसभा न झाल्याने ग्रामस्थांनी पंचायत संचालनालयाकडे आणि गटविकास अधिकाऱ्यांकडे पंचायतीविरोधात तक्रारी केल्या होत्या. त्या तक्रारींची दखल घेऊन गटविकास अधिकाऱ्यांनी मार्च महिन्यात ग्रामसभा घेण्यास सांगितले होते. पंचायतीने नोटीस जारी करून ग्रामसभा १५ मार्च रोजी होईल, असे जाहीर केले होते.
यावेळी चिंबल मंचच्या वतीने सकाळीच पंचायतीला ग्रामसभा खुल्या जागेत घ्यावी. खुल्या जागेत ग्रामसभा घेण्यास आम्ही पंचायतीला मदत करतो, असेही सांगितले. पण सरपंचांनी आहे त्याच ठिकाणी ग्रामसभा घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सभाही सुरू झाली. मात्र, उपस्थित ग्रामस्थांनी सभा खुल्या जागेत घेण्याचा आग्रह धरला.
आजच्या तारखेला सरकारकडून ग्रामसभा घेण्याच्या सूचना पाळल्या गेल्या असल्या तरी सरपंचांच्या भूमिकेमुळे आजची ग्रामसभा होऊ शकली नाही. ऑक्टोबर २०२५ची ही ग्रामसभा आता २९ मार्चला घेण्यास ग्रामस्थांनी तत्त्वतः मान्यता दिली आहे. अजून जानेवारीची ग्रामसभा झालेली नाही. लोकांचे अनेक प्रश्न असून ते ग्रामसभेत येणे आवश्यक आहेत; परंतु सरपंच ग्रामसभाच होऊ देत नाहीत. त्यामुळे त्यांची भूमिका सतत संशयास्पद राहिल्याचा आरोप शिरोडकरांनी केला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.