आसाम: सरकारने राज्यात गोमांस खाण्यावर बंदी घालण्याची घोषणा केल्यानंतर विविध राजकीय प्रतिक्रिया समोर येऊ लागल्या आहेत. लोकांनी काय खावे आणि काय परिधान करावे याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेऊ नये, असे आसाममधील विरोधी पक्ष ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट (AIUDF) ने म्हटले आहे.
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी बुधवारी राज्यात गोमांस खाण्यावर पूर्ण बंदी घालण्याची घोषणा केली. आसाममधील कोणत्याही रेस्टॉरंट, हॉटेलमध्ये गोमांस दिले जाणार नाही तसेच, कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात किंवा ठिकाणी दिले जाणार नाही, असे सरमा म्हणाले.
एआययूडीएफचे सरचिटणीस आणि आमदार हाफिज रफिकुल इस्लाम यांनी यावरुन सरकारवर टीका केली. 'भाजप गोव्यात गोमांसावर बंदी घालू शकत नाही कारण तेथे तसे केल्यास त्यांचे सरकार एका दिवसात पडेल', असे इस्लाम एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाले.
रफीकुल इस्लाम म्हणाले की, ईशान्येकडील प्रत्येक राज्यात भाजपचे स्वबळावरील सरकार आहे किंवा ते मित्रपक्षांच्या सहकार्याने सरकार चालवत आहेत. ईशान्येकडील सर्व राज्यांमध्ये गोमांस खाल्ले जाते किंवा खाण्यास परवानगी आहे. तिथं कोणत्याही प्रकारचे निर्बंध नाहीत, भाजप तेथे अशी पावले उचलत नाही, परंतु आसाममध्ये असे का करतंय? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
आसाममध्ये मुस्लिम, ख्रिश्चन अल्पसंख्याक तसेच आदिवासी लोकांच्या अनेक समस्या असून त्या समस्यांवर चर्चा व्हायला हवी. कोणाच्या घरात काय शिजणार, कोण काय घालणार, कोण काय खाणार या मुद्द्यावर नाही. हा मंत्रिमंडळाचा विषय नाही, असे हाफिज इस्लाम म्हणाले.
आसामच्या जनतेने नेत्यांच्या अशा वक्तव्यात अडकू नये, असे आवाहनही हाफिज इस्लाम यांनी यावेळी केले.
गोमांसबाबतचा आमचा सध्याचा कायदा खूप मजबूत आहे पण त्यात हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये गोमांस खाऊ शकतो की नाही याबाबत तरतूद नाही. पण, आता सरकारने आसाममध्ये सर्वत्र गोमांस खाण्यावर बंदी घातली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री सरमा यांनी माध्यमांना दिली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.